प्रतिनिधी /बेळगाव
कोनवाळ गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उच्चदाबाने होत नसल्याने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम अत्यंत संथगतीने सुरू असून ठिकठिकाणी खोदण्यात आलेल्या चरी अद्यापही बुजविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पाणीपुरवठ्याबाबत कोनवाळ गल्ली परिसरातील रहिवाशांना अनेक वेळा तक्रारी कराव्या लागल्या. याची दखल घेण्यात आली नसल्याने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तेव्हा एलअॅण्डटी कंपनीने जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेतले.
हे काम सुरू करून महिना झाला, पण अद्यापही पूर्ण झाले नाही. येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने जलवाहिनी घालण्यासाठी काँक्रीटचा रस्ता फोडावा लागला आहे. रस्ता फोडून जलवाहिनी घालण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा अवधी लागला. हे काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असून रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
आतापर्यंत केवळ जलवाहिनी घालण्यात आली आहे. पण नळजोडणी देण्यात आली नाही. खोदण्यात आलेल्या चरी व्यवस्थित बुजविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कोनवाळ गल्लीत मातीचे ढिगारे साचले आहेत. ठिकठिकाणी खोदण्यात आलेले ख•s बुजविले नाहीत. परिणामी वाहनधारकांना ये-जा करणे अडचणींचे ठरत आहे.
येथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून महिन्याभरापासून येथील समस्यांमध्येच अडकून पडावे लागले आहे. पाण्याचा पत्ता नाही. पण चरी आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नळजोडणीचे काम तातडीने पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.