पुणे / प्रतिनिधी :
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या महाराष्ट्रातील भूभागावर दावा करणाऱ्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कडक शब्दांत उत्तर दिले पाहिजे. एक इंचही जागा त्यांच्याकडे जाता कामा नये, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी येथे ठणकावले. मुख्यमंत्री शिंदे पुन्हा आमदारांसह गुवाहाटीला जाऊन आता कोणाचा बळी देणार, असा उपहासात्मक सवालही त्यांनी केला.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार यांनी शिंदे आणि फडणवीस यांना लक्ष्य केले. सीमाप्रश्नावर बोलताना पवार म्हणाले, की राज्य सरकारने जत, सोलापूरकडे लक्ष दिले पाहिजे. तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. तेथील लोकांना आपलेपणाची वागणूक मिळेल, असे प्रयत्न सरकारने करणे आवश्यक आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांचीदेखील ही जबाबदारी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक उत्तर द्यायला हवे. एक इंचही जागा त्यांच्याकडे जाता कामा नये. बेळगावचा विषय न्यायालयात आहे. सरकारने हा प्रदेश महाराष्ट्रात कसा येईल, हे बघणे गरजेचे आहे.
अधिक वाचा : सीरम फसवणूक प्रकरणात सात आरोपींना अटक
मुख्यमंत्री आता कोणाचा बळी द्यायाला चालले आहेत
मुख्यमंत्री शिंदे हे सर्व आमदारांना गुवाहाटी येथे घेऊन जाणार आहेत. तेथे ते देवीचे दर्शन घेणार असल्याबाबत विचारणा करण्यात आली असता पवार म्हणाले, मला समजले आहे, की त्यांनी तेथील हॉटेल मालकाचे बिल दिले नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने आत्महत्या केली, ही प्रसारमाध्यमांमधील चर्चा होती. ते दर्शनाला चालले आहेत, तेथे रेडा बळी देतात. आता ते कोणाचा बळी द्यायला चाललेत? लोक नवस फेडायला जात असतात. दर्शनाला जाणार असतील, तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असा टोलाही पवार यांनी लगावला.