भारतासोबतच्या मैत्रीसंबंधी रशियन राजदूताचे वक्तव्य
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि रशिया या दोन्ही देशांमधील राजनयिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन्ही देशांचे संबंध नेहमीच दृढ राहिले आहेत. यानिमित्त भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी रशियन संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन केले आहे. दोन्ही देशांच्या परस्पर सांस्कृतिक उत्सवांच्या अद्भूत परंपरेला पुन्हा सुरू करत आहोत. कोरोना महामारीमुळे या उत्सवांचे आयोजन थांबविण्यात आले होते. भारतासोबतच्या मैत्रीपेक्षा काहीच महत्त्वाचे नाही असे उद्गार यावेळी राजदूत अलीपोव्ह यांनी काढले आहेत.
रशिया-भारत धोरणात्मक भागीदारी विश्वासार्ह अन् मैत्रिपूर्ण असून जगभरातील देशांसाठी ही एक अचूक उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियन संस्कृती महोत्सव मंगळवारी नवी दिल्लीत सुरू झला आहे. हा महोत्सव 29 नोव्हेंबरपर्यंत नवी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत आयोजित होणार आहे. भारतातील महोत्सवाची सुरुवात एन्सेम्बल लेजिंकाच्या प्रदर्शनासह झाली. यात रशियातील अनोख्या लोककलेचे सादरीकरण करण्यात आले आहे.
महोत्सवात बोलताना राजदूत अलीपोव्ह यांनी मैत्रीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण काहीच नसल्याचे म्हटले. महोत्सवाचा उद्देश लोकांमधील संबंधांना चालना देणे आहे. यंदा आम्ही भारतात तीन प्रमुख, प्रसिद्ध समूह आणि नृत्य तसेच गीतसमूह घेऊन आलो आहोत. यंदाचा हा महोत्सव अत्यंत रंगबिरंगी असणार आहे असे ते म्हणाले.
भारतीय जनता रशियन खाद्यपदार्थ अन् संस्कृतीने प्रभावित होईल अशी अपेक्षा असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. हा महोत्सव रशियन संस्कृती मंत्रालय आणि भारतीय विदेश मंत्रालयाच्या अंतर्गत सांस्कृतिक संबंधांसाठी भारत परिषदेच्या सहकार्याद्वारे आयोजित करण्यात आला आहे.