मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाविषयी वाच्यता न करण्याची काँग्रेस नेत्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदांवर चर्चा करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा हायकमांडने दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची हायकमांडशी चर्चा झाली आहे. परिणामी, विनाकारण गोंधळ निर्माण होत असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पदांबाबत यापुढे कोणत्याही मंत्री किंवा आमदारांनी वाच्यता केल्यास त्यांना नोटीस बजावण्यासह शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा हायकमांडने इशारा दिला आहे.
विशेषत: मंत्र्यांनी त्यांच्याकडे सोपविलेल्या खात्यांच्या जबाबदाऱ्यांबाबतच माध्यमांना माहिती द्यावी. त्याशिवाय पक्षाबाबत विनाकारण संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थित केल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. डी. के. शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांसह काही मंत्री मुख्यमंत्री बदलाबाबत उघड वक्तव्ये करत आहेत. तर सिद्धरामय्या यांचा गट वारंवार अतिरिक्त उपमुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव देत आहे. त्यामुळे साहजिकच डी. के. शिवकुमार आणि मुख्यमंत्री यांच्यात विनाकारण संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.
यापुढे कोणत्याही पदाच्या निर्मितीबाबत हायकमांड निर्णय घेईल. त्यामुळे याबाबत राज्यातील नेत्यांनी कोणतेही वक्तव्य न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष करून मंत्री आणि आमदारांनी त्याबाबत विधाने केल्यास त्यांची तक्रार शिस्तपालन समितीकडे पाठवावी लागेल, असा इशारा एआयसीसीचे प्रधान कार्यदर्शी के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांनी दिला आहे.