पुणे, नगर / प्रतिनिधी :
आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक किंवा हसन मुश्रीफ नाहीत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही नाहीत, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्ववादी असून उपमुख्यमंत्री म्हणून हिंदुहृदयसम्राट देवेंद्र फडणवीस काम करत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हे हिंदुत्ववादी सरकार आहे हे लक्षात ठेऊनच काम करावे, असा इशारा भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी नगर येथे बोलताना दिला.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे या तरुणाने मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याने त्याचे मुलीच्या कुटुंबियांनी अपहरण केल्याचा आरोप आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. मात्र अजूनही दीपकला शोधण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. याचविरोधात भाजप आमदार नीतेश राणेंच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना राणे बोलत होते.
अधिक वाचा : आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट मेसेज पाठवून एक काेटीचा गंडा
ते म्हणाले, कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने आमच्या हिंदू मुलाकडे वाकड्या नजरेने बघितले तर त्यांचे डोळे जागेवर राहणार नाहीत, हे लक्षात ठेवावे. पोलीस प्रशासनात अनेक चांगले अधिकारी आहेत जे हिंदूंना न्याय देतात, त्यांची बाजू घेतात, सगळेच वाईट आहेत, अशातला प्रकार नाही. पण जे वाईट आहेत, ज्यांच्यासाठी माझा हा इशारा समजा”, असे राणे यांनी बजावले.
“माझ्या शेजारी दीपकचे वडील आहेत. त्यांची नेमकी काय चूक? दीपक हिंदू कुटुंबात जन्माला आला ही त्यांची चूक आहे का? आज जे दीपकबरोबर झाले, ते आपल्या कुणाही बरोबर होऊ शकते, याची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे. जसे आपल्या समोरच्या धर्माची मंडळी त्यांच्या धर्मासाठी एकत्र येतात, तसे आपणही हिंदू म्हणून एकवटले पाहिजे. तेव्हाच आपली ताकद त्यांना कळेल. मी येणार आहे म्हणून इथला पीआय सुट्टीवर गेला आहे. पण तो कधीपर्यंत सुट्टीवर जाईल, त्याला माझ्याशीच बोलायला लागेल, हे त्याने लक्षात ठेवावे, हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आरोपींना अटक झाली. पण मुलगा सापडत नाही. पण जर अजून काही दिवस दीपक सापडला नाही,तर महाराष्ट्रातला हिंदू समाज तांडव करेल, अशी धमकी राणे यांनी दिली.