रेल्वेचे स्वदेशी ‘गजराज’ तंत्रज्ञान अत्यंत खास
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात रेल्वेची धडक बसल्याने हत्तींचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे ‘गजराज’ नावाच्या नव्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रेल्वे आणि हत्ती यांच्यातील टक्कर रोखण्यास 99 टक्क्यांपर्यंत यश मिळणार असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. या तंत्रज्ञानाची आसामच्या अनेक हत्तीप्रवण रेल्वेमार्गावर प्रायोगिक चाचणी करण्यात आली असून ती अत्यंत यशस्वी ठरली आहे. आता या तंत्रज्ञानाचा वापर देशभरातील हत्तीप्रवण असलेल्या रेल्वेमार्गांच्या परिसरात केला जाणार आहे.
पुढील 7-8 महिन्यांमध्ये रेल्वेमार्गांवर हत्ती येण्याचा धोका असलेल्या सर्व ठिकाणी ही यंत्रणा तैनात केली जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. देशात 2012-22 दरम्यान रेल्वेची धडक बसल्याने सुमारे 200 हत्तींचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक 55 हत्ती पश्चिम बंगालमध्ये मारले गेले आहेत. यानंतर आसाममध्ये 33 हत्तींचा मृत्यू ओढवला आहे. ओडिशात 14 तर उत्तराखंडमध्ये 9 हत्तींचा रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाला आहे. हत्तींचे हेच मृत्यू रोखण्यासाठी रेल्वेने काही दिवसांपूर्वी नॉर्थ-ईस्टर्न फ्रंटियर भागातील आसामच्यू न्यू अलीपुरद्वार आणि लामडिंग जंक्शन रेल्वेमार्गावर या तंत्रज्ञानाचे प्रायोगिक परीक्षण केले आहे.
या इंट्य्राशन डिटेक्शन सिस्टीमध्ये ऑप्टिकल फायबरद्वारे हत्तींच्या पाय ठेवण्याच्या चाहुलीचा शोध लावला होता. जमिनीत असलेल्या या केबवल एका निश्चित वजनापेक्षा अधिक प्रेशर वेव्ह निर्माण झाल्यास एखादी अवजड गोष्ट त्यावरून गेल्याचे समजते. यात हत्ती असो किंवा अशाचप्रकारचा अन्य वजनी प्राणी तेथे पोहोचल्यास याची माहिती रेल्वेला मिळणार आहे. ही सिस्टीम हत्ती रेल्वेमार्गापासून 200 मीटरच्या अंतरावर असतानाच याची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला पुरविणार आहे. जेथून त्या मार्गावरून जात असलेल्या रेल्वेच्या लोको पायलटला वायरलेस किंवा मोबाइल फोन सिस्टीमद्वारे त्वरित हत्तींबद्दल सतर्क करण्यात येणार आहे. यामुळे पायलट वेळीच रेल्वेचा वेग कमी करेल आणि हत्तीचा जीव वाचू शकणार आहे. तसेच हत्ती रेल्वेमार्ग ओलांडत असल्यास रेल्वे रोखण्याचे पाऊल उचलले जाणार आहे.