एपीएमसीमधील भाजीमार्केट व्यापाऱयांनी केली निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसीमध्ये असलेले भाजीमार्केट आता पूर्णपणे बंद होताना दिसत आहे. ग्राहक नसल्यामुळे आता व्यापारी अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यापारी आमची दुकाने घेऊन आम्हाला आमची रक्कम परत द्या, अशी मागणी करत आहेत. जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे.
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तसेच स्थानिक राजकीय व्यक्तींमुळे एपीएमसी बंद पडण्याची वेळ आल्याचा आरोप भाजी व्यावसायिक करत आहेत. एपीएमसीमध्ये दुकाने देताना आमच्याकडून मोठी रक्कम घेतली. मात्र त्यानंतर बेकायदेशीर भाजीमार्केट उभारणीस जिल्हा प्रशासनानेच आणि सरकारनेच प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे आता हे भाजीमार्केट बंद पडण्याची वेळ आली आहे.
आम्ही कर्जे काढून रक्कम दिली आहे. त्यामुळे बँक आणि सोसायटीधारक आमच्या घराकडे वसुलीसाठी येत आहेत. तेव्हा आता आमची रक्कम परत द्या आणि तुमची दुकाने घ्या, असे यावेळी सांगितले. एकूणच एपीएमसीमधील भाजीमार्केटच्या या प्रकाराला सरकार आणि येथील स्थानिक जिल्हा प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वास्तविक एक भाजीमार्केट असताना दुसऱया भाजीमार्केटला परवानगी देणे चुकीचे आहे. बेकायदेशी अनेक कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसू लागला आहे. एकूण 132 गाळेधारक आहोत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापारच होणे कठीण झाले आहे. एपीएमसीने नाहक यामध्ये गुंतवणूक केली आहे. हे मार्केट बंद पडत असताना पुन्हा 40 गाळय़ांची उभारणी कशासाठी करण्यात येत आहे? असा प्रश्नदेखील या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
सर्वसामान्य जनतेचा पैसा नाहक खर्च केला जात आहे. तेव्हा सरकारने याचा विचार करावा, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सतीश पाटील, बसगौडा पाटील, सदानंद पाटील, गिरीष कुडोळी यांच्यासह व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.