पाच राज्यातील निकालानंतर आता विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठकांचे सत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्यप्रदेश , छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या चार राज्यांबरोबरच आता मिझोराम विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झालेले दिसत आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. तर तेलंगणात काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा पराभव करून सत्ता काबीज केली. आता या चार राज्यांना नवे मुख्यमंत्री मिळतील. पक्ष पातळीवरील बैठकीत विधिमंडळ नेत्याची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे. तसेच डबल इंजिनचे सरकार आल्यानंतर राज्याच्या विकासकामांना गती येणार आहे.
भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये चमकदार कामगिरी करत तिन्ही राज्यांमध्ये बहुमत मिळवले आहे. या निकालांमध्ये भाजपची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. मध्यप्रदेशबद्दल भाजपने 230 पैकी 163 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ 66 जागा मिळाल्या. भारतीय आदिवासी पक्षाने एक जागा जिंकली आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागांवर निवडणूक झाली. यापैकी भाजपने 115, काँग्रेसने 69 जागा जिंकल्या आहेत, तर भारतीय आदिवासी पक्षाने 3, बसपाने 2, आरएलडीने 1 तर अपक्षांनी 8 जागा जिंकल्या आहेत. तीनही राज्यातील निर्विवाद वर्चस्वानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली वेग घेत आहेत.
छत्तीसगडमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची प्रतीक्षा
छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाने राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे. छत्तीसगडमधील 90 जागांपैकी भाजपने 54 जागा जिंकल्या असून काँग्रेसला 35 जागा प्राप्त झाल्या. आता राज्यातील जनतेने पुढील पाच वर्षांचे राज्याचे भवितव्य भाजपकडे सोपवले आहे. राज्यातील कामगिरीवर भाजप नेते खुश आहेत. निकालानंतर राज्यात भाजप कोणाला मुख्यमंत्री करणार? याची चर्चा सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नेते रमण सिंह यांनी ‘याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील’ असे स्पष्ट केले आहे. तसेच काँग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल, असे रमण सिंह यांनी सांगितले. विधिमंडळ पक्षनेते निवडीची प्रक्रिया दोन-तीन दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. पक्ष माझ्यावर जी काही जबाबदारी देईल, ती मी पार पाडेन. दोन-तीन दिवसांत विधिमंडळ पक्षनेते निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार असून सरकार स्थापनेला फारसा वेळ लागणार नाही. आता काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपने यापूर्वीही शेतकऱ्यांना प्राधान्य दिले आहे आणि यापुढेही देणार असल्याचे ते म्हणाले.