काँग्रेसचे माध्यम प्रभारी हर्षद शर्मा यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
राज्यात बेसुमार वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात पूर्णत: अपयशी ठरलेल्या भाजप सरकारला आता राज्यात अमर्याद वाढलेले रस्ता अपघात आणि त्यात जाणारे निष्पापांचे बळी रोखण्यातही अपयश आले आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. नववर्षाच्या प्रारंभापासून आतापर्यंत केवळ 53 दिवसांत राज्यात झालेल्या विविध अपघातांत तब्बल 50 जणांचे बळी गेले असल्याची आकडेवारीही यावेळी जाहीर करण्यात आली.
काँग्रेसचे गोवा माध्यम प्रभारी हर्षद शर्मा यांनी शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. त्यावेळी सरचिटणीस विजय भिके, वीरेंद्र शिरोडकर उपस्थित होते. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. त्यात निष्पापांचे बळी जात आहेत. हे प्रकार रोखण्यात आणि गुन्हे नियंत्रणात आणण्यात भाजप सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचे शर्मा म्हणाले.
गतवर्षी 2800 हून अधिक अपघात झाले व त्यात सुमारे 532 लोकांना जीव गमवावा लागला. त्यापैकी तब्बल 98 अपघात नववर्षाच्या पूर्वसंध्येला झाले. तरीही सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. परिणामी 2024 मध्येही या अपघातांची मालिका सुरूच राहिली असून 1 जानेवारी ते आतापर्यंत 53 अपघातात 50 जणांचे बळी गेले आहेत. त्यापैकी केवळ गेल्या 16 दिवसांत 9 जणांनी जीव गमावला आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत एका बाजूने राज्य सुरक्षित असल्याच्या बढाया मारत असले तरी दुसऱ्या बाजूने बलात्कार, विनयभंग, चोरी, अमलीपदार्थांच्या कारवाया यासारखे गुन्हे बेसुमार वाढत आहेत. हे सर्व पाहता सुरक्षितता कुठे आहे, असा प्रश्न निर्माण होतो, असे विजय भिके म्हणाले.
रस्ते अपघातात निष्पापांना जीव गमवावा लागत असताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो बेजबाबदार विधाने करत आहेत, असा आरोप भिके यांनी केला व मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असे आवाहन केले. राज्यातील लोकांप्रति मुख्यमंत्री खरोखरच संवेदनशील असतील तर आपल्या मागणीचा विचार करतील, असे आव्हानही भिके यांनी दिले