28 सप्टेंबरपासून मालिकेस प्रारंभ, थिरुवनंतपूरमध्ये पहिला सामना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात आस्ट्रेलियात होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी भारताने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका आयोजित केल्या. त्यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका रविवारी भारताने शेवटचा सामना जिंकून 2-1 अशा फरकाने जिंकली. आता उद्या 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला सुरुवात होत आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार प्रदर्शन करीत तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. शेवटच्या सामन्यात विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांनी शानदार अर्धशतके नोंदवली. पण गोलंदाजीत फिरकी गोलंदाज अक्षर पटेल वगळता अन्य गोलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. हार्दिक पंडय़ा फलंदाजीत चमक दाखवतोय, पण रोहितने गोलंदाजीत त्याचा जपूनच वापर केलेला दिसतो. जखमी जडेजाच्या जागी आलेल्या अक्षर पटेलने मात्र आपली संघातील जागा फिक्स केली आहे तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रोहित पंतपेक्षा अनुभवी दिनेश कार्तिकला जास्त पसंती देताना दिसला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना 28 रोजी थिरुवनंतपूरम येथे होणार असून या मालिकेसाठी अर्शदीप सिंग व दीपक हुडा यांचे संघात पुनरागमन झाले आहे. मोहम्मद शमीला कोरोना झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियाच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच दीपक हुडाचा पाठदुखीचा त्रास बळावला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो या मालिकेत खेळण्याबाबत साशंकताच आहे. हार्दिक पंडय़ा व भुवनेश्वरला या मालिकेत विश्रांती देण्यात आली असल्याने दीपक चहरला संधी मिळू शकते.
शेवटच्या सामन्यात हर्षल पटेल व बुमराह यांना पुनरागमनाची संधी मिळाली. पण दोघांकडूनही नीरस प्रदर्शन झाले. पटेलला एक बळी मिळाला असला तरी दोन षटकांत त्याने 18 धावा दिल्या तर बुहमराने एकही बळी न मिळविता तब्बल 50 धावा दिल्या. मोठय़ा ब्रेकनंतर दोघेही परतल्यामुळे त्यांना प्रभाव टाकता आला नसावा. पण विश्वचषकाआधी त्यांना फॉर्म मिळेल, असे कर्णधार रोहित या दोघांचे समर्थन करताना म्हणाला. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी महत्त्वाची असते आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्याबद्दल प्रेडिक्ट करता येऊ नये, अशा प्रकारची गोलंदाजी करणे अपेक्षित असते. भुवीसाठी आम्ही योजना आखत असून त्यावर काम सुरू करण्यात आले आहे. प्रदर्शन निष्प्रभ झाले असले तरी तो एक दर्जेदार गोलंदाज असून त्याला पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. या प्रदर्शनाचा त्याच्या आत्मविश्वासावर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही रोहितने स्पष्ट केले.
टी-20 विश्वचषक स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून भारताची सलामी पाकविरुद्ध 23 ऑक्टोबरल होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेचे वेळापत्रक
28 सप्टेंबर पहिला सामना थिरुवनंतपूरम सायं.7 वा.
2 ऑक्टाबर दुसरा सामना गुवाहाटी सायं. 7 वा.
4 ऑक्टाबर तिसरा सामना इंदोर सायं. 7 वा.
या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे.
विराट कोहली व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये 16000 धावा बनविणारा दुसरा फलंदाज
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये (वनडे व टी-20) सोळा हजार धावांचा टप्पा गाठणारा दुसरा फलंदाज बनला आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यावेळी त्याने हा माईलस्टोन गाठला. या सामन्यात तो पूर्ण बहरात असल्याचे दिसून आले. त्याने 48 चेंडूत 63 धावा फटकावताना सूर्यकुमार यादवसमवेत शतकी भागीदारी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कोहलीच्या आता 16004 धावा झाल्या असून एकूण 369 सामन्यांतील 352 डावांत 55.95 धावांच्या सरासरीने त्याने या धावा जमविल्या आहेत. त्यात 44 शतके व 97 अर्धशतकांचा समावेश आहे. 262 वनडेत 57.68 च्या सरासरीने त्याने 12344 धावा 43 शतके व 64 अर्धशतकांसह जमविल्या आहेत. 183 ही वनडेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. टी-20 मध्ये 107 सामन्यात 3660 धावा 50.83 धावांच्या सरासरीने केल्या असून त्यात 1 शतक व 33 अर्धशतके आहेत. नाबाद 122 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. अलीकडेच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत अफगाणविरुद्ध त्याने हे शतक नोंदवले.
असा माईलस्टोन गाठणारा सचिन तेंडुलकर हा क्रिकेट विश्वातील पहिला फलंदाज आहे. त्याने 463 वनडे सामने खेळत 18426 धावा 44.83 धावांच्या सरासरीने जमविल्या. त्यात 49 शतके व 96 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 200 ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी आहे. मात्र त्याने फक्त एक टी-20 सामना खेळला असून त्यात त्याने 10 धावा जमविल्या होत्या. त्यामुळे व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये त्याच्या 464 सामन्यांत 43.58 च्या सरासरीने 18436 धावा झाल्या आहेत.
भारताचा कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 विजयाचा विक्रम
रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ज्ंिांकून भारताने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवताना पाकिस्तानला मागे टाकले. रविवारचा विजय हा भारताचा या वर्षातील 21 वा विजय होता. याआधी पाकिस्तानने 2021 मध्ये सर्वाधिक 20 सामने जिंकण्याचा विक्रम केला होता.
भारताने या वर्षात फेब्रुवारीमध्ये विंडीजवर 3-0, त्याच महिन्यात लंकेवर 3-0 असा विजय मिळविला. त्यानंतर जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशातील मालिका 2-2 अशी बरोबरीत राहिली. यातील शेवटचा सामना पावसामुळे होऊ शकला नव्हता. जुलैमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत भारताने 2-1 अशी बाजी मारली आणि नंतर आयर्लंडला त्यांच्याच भूमीत 2-0 असे नमविले. जुलै-ऑगस्टमध्ये विंडीज दौऱयात भारताने विंडीजवर 4-1 अशी मात केली. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत भारताला जेतेपद राखता आले नाही. सुपर फोर फेरीत भारताला तिसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत त्यांनी 3 सामने जिंकले. यानंतर ऑस्ट्रेलियाला त्यांनी 2-1 अशी मात दिली असून दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य आता समोर आहे.