2 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी : सुटय़ा पैशांची कटकट संपणार
प्रतिनिधी /बेळगाव
प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी परिवहनने प्रवास कार्ड कॅशलेस योजना सुरू केली आहे. या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढणे सोयीस्कर होत आहे. वडगाव, येळ्ळूर, अनगोळ, धामणे, सुळगा, देसूर आदी बसना ट्रव्हल कार्ड योजना सुरू आहे. मात्र, आता येत्या काळात शहर आणि ग्रामीण भागातील सर्व बसमध्ये देखील ट्रव्हल कार्ड योजना सुरू केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनने दिली आहे. त्यामुळे आता बसचा प्रवासही स्मार्ट होणार आहे.
बेळगाव परिसरातील 20 बसेसना प्रायोगिक तत्त्वावर ट्रव्हल कार्ड दिले आहे. हा प्रयोग यशस्वी होत असल्याने इतर सर्वच बसना ट्रव्हल कार्ड सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे सुटय़ा पैशांची कटकट मिटणार आहे. बेळगाव विभागातून शहर आणि ग्रामीण भागात दैनंदिन 700 हून अधिक बस विविध मार्गावर धावतात. या बसमध्ये ही सुविधा आता पुरविली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता तिकीट न काढता या कार्डच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे खिशात सुटे पैसे ठेवायची गरज नाही
.दैनंदिन प्रवास करणाऱया कामगार आणि नोकरदार वर्गाची संख्या अधिक आहे. या कर्मचाऱयांना हे ट्रक्हल कार्ड उपयुक्त ठरणार आहे. प्रवास करताना बसवाहक आणि प्रवाशांमध्ये सुटय़ा पैशांवरून वाद होतात. मात्र, आता ट्रव्हल कार्डमुळे सुटय़ा पैशांची कटकटही थांबणार आहे. परिवहनकडून हे ट्रव्हल कार्ड मोफत वितरित होत असले तरी यासाठी रिचार्ज करणे आवश्यक आहे. साधारण 100 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत रिचार्ज करता येते. शिवाय या ट्रव्हल कार्डद्वारे कुटुंबातील किंवा आपल्या मित्र वा नातेवाईकांपैकी कोणीही प्रवास करू शकते. शिवाय प्रवाशांनी जितका प्रवास केला तितकेच पैसे या कार्डातून वजा होतात. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱया प्रवाशांना हे कार्ड रिचार्ज करून प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. शिवाय या कार्डमुळे खिशात पैसे आहेत की नाही, याची देखील चिंता करावी लागणार नाही. 2 ऑक्टोबरपासून शहर आणि ग्रामीण भागातील सर्व बसमध्ये ही ट्रव्हल कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर प्रवाशांनी ट्रव्हल कार्ड घेऊन आणि त्यामध्ये रिचार्ज करून प्रवास करावा, असे आवाहन देखील परिवहनने केले आहे.
प्रवाशांचा प्रवास होणार सुलभ
सध्या येळ्ळूर, वडगाव, अनगोळ भागातील बसना ट्रव्हल कार्डची सुविधा उपलब्ध केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून शहर आणि ग्रामीण भागातील बसनादेखील ही सुविधा पुरविली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे. शिवाय सुटय़ा पैशांचा वाद देखील कमी होणार आहे
– के. के. लमाणी, विभागीय संचार अधिकारी