‘त्या’ तिघांना हिंडलगा कारागृहात हलविले : फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था : एकूण कैद्यांची संख्या 926 इतकी
प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील फाशीच्या कैद्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे. दुहेरी खून प्रकरणात चिकोडी येथील सातवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या तिघा जणांना याच कारागृहात हलविण्यात आले असून त्यामुळे फाशीच्या कैद्यांची संख्या 30 वर पोहोचली आहे.
संपूर्ण राज्यात स्वतंत्रकाळापासून अतिसुरक्षित समजल्या जाणाऱया हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही न्यायालयात फाशीची शिक्षा झाली तर संबंधित कैद्यांना याच कारागृहात हलविण्यात येते.
बुधवार दि. 15 जून रोजी ममदापूर के. के. (ता. चिकोडी) येथील बाबू मुत्ताप्पा आकळे, नागाप्पा मुत्ताप्पा आकळे, मुत्ताप्पा भीमाप्पा आकळे यांना चिकोडी येथील सातवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. चव्हाण यांनी फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेच या तिघांना हिंडलगा कारागृहात हलविले आहे.
बाबू आकळेची पत्नी संगीता व बसवराज प्रभाकर बुर्जी या दोघा जणांना अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाडाला बांधून घालून कोयत्याने हल्ला करून त्यांचा भीषण खून करण्यात आला होता. 22 ऑक्टोबर 2013 रोजी रात्री ही घटना घडली होती. 9 वर्षांनंतर न्यायालयाने तिघा जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
उर्वरित प्रक्रियेनंतरच शिक्षेची अंमलबजावणी
चिकोडी तालुक्मयातील तिघे जण या कारागृहात येण्यापूर्वी फाशीच्या कैद्यांची संख्या 27 इतकी होती. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. आणखी तिघा जणांची भर पडल्यामुळे ही संख्या 30 वर पोहोचली आहे. या तिघांना फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देता येणार आहे. उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शिक्षेची अंमलबजावणी केली जाते.
यापूर्वी कुख्यात चंदन तस्कर विरप्पन्न टोळीतील मिशेकार मादय्या, बिलवेंद्र, ज्ञानप्रकाश, सायमन आदींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर याच कारागृहात ठेवण्यात आले होते. राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज, त्यानंतर उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात झालेली न्यायालयीन लढाई यामुळे त्यांची फाशी रद्द करून जन्मठेप कायम केल्यानंतर त्यांना येथून हलविण्यात आले.
सध्या खतरनाक उमेश रेड्डी, सायनाईड मल्लिका आदी याच कारागृहात आहेत. फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना अतिसुरक्षित असे अंधेरी विभागात ठेवण्यात येते. 1162 हून अधिक कैद्यांना ठेवण्याची क्षमता असलेल्या या कारागृहात शुक्रवारी रात्रीपर्यंत कैद्यांची संख्या 926 इतकी होती. यामध्ये 889 पुरुष व 37 महिला आहेत. तीन लहान मुलेही आपल्या आईंसमवेत सध्या याच कारागृहात आहेत.