ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशासह जगभरातून यावक्तव्याचं निषेध करण्यात येत आहे. आखाती देशातही भारताविषयी वाईट प्रतिमा तयार झाली होती. अखेर, भाजपने नुपूर शर्मा हिची पक्षाच्या प्रवक्ता पदावरून हकालपट्टी केली. या प्रकारावरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नुपुर शर्मा यांच्यावर कठोर ताशेरे ओढले. देशात सध्या जे काही होतंय त्या केवळ ही महिला जबाबदार आहे. त्यामुळे नुपुर शर्मा यांनी देशाची माफी मागावी, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. विशेष म्हणजे यावेळी शर्मा यांच्या वकिलांनी त्यांनी माफी मागितल्याचं सांगितलं. त्यावर न्यायालयाने शर्मांनी भावना दुखावल्या असतील तर असं म्हणत सशर्त माफी मागितल्याचं निरिक्षण नोंदवलं. तसेच त्यावर नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्माला फटकारताना, तुम्ही देशाची बदनामी केली असून अशाप्रकारचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. त्यामुळे तुम्ही टीव्हीसमोर जनतेची माफी मागावी, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच, विविध राज्यात सुरू असलेले तिचे खटले एकाच ठिकाणी करण्यात यावे, अशी मागणी नुपूरने केली होती. ही याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
न्यायमूर्ती सुर्यकांत म्हणाले, “आरोपी महिलेने कशापद्धतीने भावन भडकावल्या हे आम्ही टीव्हीवरील चर्चेत पाहिलं. ज्या पद्धतीने या महिलेने वक्तव्य केलं आणि नंतर मी एक वकिल असल्याचं सांगितलं ते लज्जास्पद आहे. तिने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे.”
शर्मा यांच्या वकिलांनी त्यांनी माफी मागितल्याचं सांगितल्यानंतर न्यायालयाने ती माफी सशर्त होती, असं नमूद करत आरोपीने टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, असं मत मांडलं. तसेच आरोपीने आपलं वक्तव्य मागे घेण्यास खूप उशीर केला, तरी सशर्त माफी मागितल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच नुपूर शर्मा स्वतःला वकील समजते, त्यामुळे तिच्याक़डून अशा वक्तव्यांची अपेक्षा नाही. तिच्या या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले असल्याचंही सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उदयपूर हत्याकांड घडले होते. नुपूर शर्मामुळेच हे हत्याकांड घडल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे नुपूर शर्मांला अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची गरज नव्हती. नुपूर शर्माने माफी मागायला उशीर केला आहे. सत्तेच्या जोरावर अधिराज्य गाजवू नये, असं न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच, अँकरने असं वक्तव्य करण्यासाठी भडकावले असेल तर त्यांच्यावरही गुन्हा का दाखल करू नये असं न्यायालायने म्हटलं आहे.
आरोपी नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात दाखल झालेले गुन्हे एकाच ठिकाणी दिल्लीत हस्तांतरीत करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत नुपुर शर्मा यांना धमक्या मिळत असल्याचाही दावा शर्मा यांच्या वकिलांनी केला. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कठोर ताशेरे ओढत नुपुर शर्मा यांना सुनावले.