कोलकाता / वृत्तसंस्था
भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मांविरोधात कोलकाता पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली असतानाही त्यांनी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाकडे आपल्या चौकशीसाठी वेळ वाढवून मिळण्याची मागणी केली आहे. वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा त्यांनी केला. तथापि, कोलकाता पोलिसांनी त्यांना ई-मेल पाठवून आता अधिक वेळ वाढवून मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी मोहम्मद पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल कोलकातामध्ये नुपूरविरोधात 10 एफआयआर दाखल आहेत. या नोटीसपूर्वी पश्चिम बंगालमधील एमहर्स्ट आणि नरकेलदांगा पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी हजर न होता वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजपने नुपूर शर्मा यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली होती. तथापि, त्यांच्यावर देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यामुळे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. तसेच नुपूर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयानेही फटकारले होते. नुपूर शर्मांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण देश पेटला आहे. त्यांनी टीव्हीवर येऊन माफी मागावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. तथापि, काही माजी न्यायमूर्ती आणि सनदी अधिकाऱयांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर ताशेऱयांबाबत नाराजी व्यक्त केलेली दिसते.
ममता बॅनर्जींकडून अटकेची मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुपूर शर्मांच्या अटकेची मागणी केली आहे. नुपूर शर्मांमुळे देशात आगीचा वणवा पेटल्याचा दावा करत त्यांना अद्याप अटक न झाल्याबद्दलही ममतांनी शंका उपस्थित केली आहे. हा संपूर्ण वाद हे भाजपचे षड्यंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपचे द्वेषपूर्ण राजकारण आणि फुटीरतावादी धोरण हे जनतेत फूट पाडण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.