बालक-बाळंतीण-गर्भवतींचा समावेश
बेळगाव : बालक, बाळंतीण आणि गर्भवती महिलांतील कुपोषण कमी व्हावे, यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये विशेषत: पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले जाते. यासाठी प्रत्यक्ष अंगणवाडी केंद्रात प्रात्यक्षिके सादर केली जातात. 2018 पासून या पोषण अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. सुरुवातीची दोन वर्षे कोरोनामुळे अडचणी आल्या. मात्र 2021 पासून हा उपक्रम सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सुरळीत सुरू झाला आहे. या अंतर्गत जेवण, विविध पदार्थांचे प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा यासह इतर उपक्रमही राबविले जातात. प्रत्यक्ष बालक, गर्भवती महिला आणि बाळंतिणींच्या समोर प्रात्यक्षिक सादर करून महत्त्व पटविले जाते.
जिल्ह्यात 5331 अंगणवाडी केंद्रे आहेत. अलीकडे यामध्ये लहान-सहान अंगणवाडी केंद्रांची भर पडली आहे. या सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान राबविण्याच्या सूचना महिला व बालकल्याण खात्याने केल्या आहेत. सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये महिनाभर विविध उपक्रम राबवून आहाराचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. विशेषत: बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. यासाठी गर्भवती महिला आणि 0 ते 6 वयोगटातील बालकांना या अभियानात सामावून घेतले जात आहे. या अभियानाबरोबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनाही सूचना केल्या आहेत. मागील दोन वर्षात राबविलेल्या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदादेखील राष्ट्रीय पोषण अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा महिला व बालकल्याण खात्याला आहे.