ऑनलाईन टीम
“ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण होणे हे भाजपाचे पाप आहे. अनेकदा आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या फडणवीस साहेबांच्या बोलण्यावर जनतेचा विश्वास बसणार नाही,” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर केली आहे.
राज्यात ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापले आहे. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. भाजपने आक्रमक भूमिका घेत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्याचा आरोप करत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिले नाही तर, राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा देखील केली. काँग्रेसनेही आंदोलन करत ओबीसींचे राजकीय आरक्षण जाणे हे भाजपचे पाप असल्याचा आरोप केला. आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीती आयोगाच्या अध्यक्षांना व पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून ओबीसींच्या जनगणनेची माहिती मागितली होती. दोन वर्षं भाजपा नेत्यांनी मागणी करुनही केंद्र सरकार ती देत नसेल तर त्यात मविआ सरकारची चूक ती काय?, असा सवालही सावंत यांनी केला आहे.
“अध्यादेश कोणी काढला? फडणवीस सरकार, प्रभागरचना कोणी केली? फडणवीस सरकार, औरंगाबाद व नागपूर खंडपीठाने स्थगिती कोणाच्या काळात दिली? फडणवीस सरकार, ओबीसी जनगणनेच्या माहितीसाठी केंद्राला कोणी पत्र लिहिले? फडणवीस सरकार, दोन वर्षं माहिती कोणी दिली नाही? मोदी सरकार, मग महाविकासआघाडी सरकारची चूक ती काय?” असा सवालही सावंत यांनी केला आहे.