शहर म. ए. समितीचे आवाहन : हुतात्मा चौकात करणार अभिवादन
प्रतिनिधी /बेळगाव
भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर अन्यायाविरोधात लढा पुकारलेल्या अनेक सीमावासियांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दि. 17 रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. सीमाबांधवांनी हा दिवस गांभीर्याने पाळून सकाळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन शहर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
1956 मध्ये तत्कालिन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांनी भाषावार प्रांत रचना केली आणि बेळगावसह मराठीबहुल भाग म्हैसूर प्रांताला जोडण्यात आला. मराठी भाषिक असतानाही कानडी प्रांताला जोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. त्यामुळे झालेल्या गोंधळामध्ये पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जावू नये यासाठी दरवर्षी हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते.
यावर्षी मोठ्या संख्येने मराठी भाषिकांनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर समितीचे सरचिटणीस किरण गावडे, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, दक्षिण विभाग महिला आघाडीच्या प्रमुख सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर यांनी केले आहे.
शिवसेनेचे आवाहन
हुतात्मा दिनादिवशी मोठ्या संख्येने सीमावासियांनी अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन सीमाभाग शिवसेनेच्यावतीने करण्यात आले. रामलिंगखिंड गल्ली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, दिलीप बैलूरकर, प्रवीण तेजम, महेश टंकसाळी, दत्ता पाटील, राजकुमार बोकडे, रमेश माळवी, राजू कणेरी, बाळासाहेब डंगर्ले, प्रकाश हेब्बाजी यासह इतर उपस्थित होते.
शहर म. ए. समितीचे आवाहन
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. मंगळवार दि. 17 रोजी सकाळी 9.30 वाजता सर्वांनी हुतात्मा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गोवावेसचा राजा मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. 17 रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 8 या वेळेत गोवावेस येथील गणपती मंदिरात रक्तदान शिबिर होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने सीमावासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्या सीमालढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन गांभीर्याने पाळण्याचे म. ए. समितीचे आवाहन
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेक सीमाबांधव हुतात्मे झाले. सीमालढ्यासाठी त्यांनी कोणताही विचार न करता प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानाची आठवण व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने प्रतिवर्षी 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन आयोजित केला जातो. यावर्षीही मंगळवारी हुतात्मा चौक येथे सकाळी 9.30 वा. हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे.
1956 मध्ये भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी केंद्र सरकारने कोणताही विचार न करता बेळगावमधील मराठी बहुल भाग म्हैसूर प्रांताला जोडला. कानडी प्रांताला सीमाभाग जोडला गेल्याने जनसमुदाय प्रक्षोभ झाला. या दरम्यान उडालेल्या गोंधळामुळे पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये अनेक सीमावासियांनी प्राणाची आहुती दिली. तर अनेकांची तुरुंगामध्ये प्राणज्योत मालवली. या सर्व हुतात्म्यांना म. ए. समितीच्यावतीने अभिवादन केले जाते.
यानिमित्त हुतात्मा चौक येथे मंगळवार दि. 17 रोजी अभिवादन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शहर परिसरात फेरी काढून हुतात्मा मधू बांदेकर, महादेव बारागडी, लक्ष्मण गावडे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. त्याचबरोबर कंग्राळी येथेही अभिवादन केले जाणार आहे.
असा असणार फेरीचा मार्ग
हुतात्मा चौक येथे अभिवादन केल्यानंतर रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लेस्कर रोड येथून पुन्हा हुतात्मा चौकापर्यंत शांततेत फेरी काढली जाणार आहे.