खानापूर म. ए. समिती बैठकीत निर्णय : एकीनंतर तालुक्यात उत्साही वातावरण, सर्वांना घेऊन वाटचाल करण्याची ग्वाही
प्रतिनिधी / खानापूर
मध्यवर्ती समितीने खानापूर तालुका समितीच्या एकीसंदर्भात घेतलेला निर्णय हा सर्वमान्य असून अध्यक्ष या नात्याने सर्वांना विश्वासात घेऊन समितीच्या वाटचालीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, गेल्या काही वर्षात जे घडले ते आपण सर्वांनी विसरुन जावू, आणि समितीच्या भगव्यासाठी एक दिलाने कार्यरत राहूया, तालुक्यातील समिती कार्यकर्त्यांना निश्चितच कार्यकारिणीत आणि कमिटीत सामावून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे वक्तव्य म. ए. समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी समितीच्या बैठकीत व्यक्त केले. दि. 17 जानेवारीला हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सकाळी 9.30 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षापासून समितीत दोन गट कार्यरत होते. मध्यवर्ती म. ए. समितीने नुकतीच नवीन कार्यकारिणी जाहीर करून अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सचिव पदाची नावे जाहीर केली होती. त्या अनुषंगाने खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. सुरवातीला सीताराम बेडरे यांनी प्रास्ताविक करुन बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी अर्जुन देसाई म्हणाले, समितीची एकी ही योग्य वेळेला झाली असून आता सर्वांना घेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. समितीचा अग्निकुंड पुन्हा चेतवला पाहिजे, तालुक्यात राष्ट्रीय पक्षानी आपले जाळे विणले आहे. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे, तसेच समिती पदाधिकाऱ्यांनी कोणतेही गाळबोट लागू नये, याची खबरदारी घ्यावी.
समितीची एकी राष्ट्रीय पक्षाना धोक्याची घंटा
विठ्ठल ठाखर म्हणाले, मराठी अस्मितेचा स्वाभिमान जागृत ठेवून समितीच्या विजयाची पताका पुन्हा फडकवूया, भैरु कुंभार म्हणाले, समितीची एकी ही राष्ट्रीय पक्षाना धोक्याची घंटा आहे. तालुक्यातील मराठी भाषिक युवा वर्ग राष्ट्रीय पक्षांच्या गळाला लागला आहे. यासाठी युवकाना समितीत सक्रिय करुन घेण्यासाठी तातडीने उपक्रम हाती घेतले पाहिजेत.
रमेश धबाले म्हणाले, गेल्या वर्षभरापासून एकीसाठी जे प्रयत्न केले होते. त्याला आता यश आले आहे. सर्वांनी झाले गेले विसरुन एका दिलाने समितीच्या कार्याला वाहून घेऊया, तसेच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अथवा जबाबदार कार्यकर्त्यांनी राजकीय व्यासपीठावर जाता कामा नये.
समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे
निरंजन सरदेसाई म्हणाले, आपण भाषिक पारतंत्रात आहोत, यासाठी समितीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन या पारंतत्र्यांच्या विरोधात लढा उभारणे गरजेचे आहे. या समितीच्या एकीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. पांडुरंग सावंत म्हणाले, राष्ट्रीय पक्षानी तालुक्यात आपली पाळेमुळे खोलवर रुजवली आहेत. यासाठी आता एका दिलाने हा लढा पुन्हा सक्रिय केला पाहिजे. सर्वांनी एक दिलाने समितीच्या झेंड्याखाली कार्यरत रहावे. प्रकाश चव्हाण म्हणाले, आज आम्ही एकत्र आलो आहोत, त्यामुळे सीमाप्रश्नाच्या लढ्याला वेगळे बळ मिळाले आहे. आज जे आमच्याबरोबर नाहीत, त्या सर्वांना समितीत आपण सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुया, आपण एकत्र आलेलो आहोत, या एकीतून समितीचा भगवा झेंडा पुन्हा तालुक्यात डौलाने फडकूया आणि आमच्या एकीचे बळ दाखवून देवूया.
समितीच्या एकसंघ वाटचालीसाठी सर्वांनी प्रयत्न करुया
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, मध्यवर्ती समितीने आज जो निर्णय दिलेला आहे. तो आम्हास मान्य असून मध्यवर्तीचे मी अभिनंदन करतो आणि समितीच्या एकसंघ वाटचालीसाठी आपण सर्वांनी प्रामाणिक कार्य करुया.
यावेळी आबासाहेब दळवी, बाळासाहेब शेलार, सदानंद पाटील यांनीही आपापले विचार मांडले. 17 जानेवारी हुतात्मा दिनी सकाळी 9.30 वाजता स्टेशनरोडवरील हुतात्मा स्मारकास हुतात्मांना अभिवादन करण्यात येणार आहे.