सध्या हवामान बदलाचे भीषण परिणाम जगभरात दिसून येऊ लागले असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जो तो प्रयत्न करायला लागलाय…मोदी प्रशासनही त्या दिशेनं भरपूर धडपड करतंय. त्याची एक झलक म्हणजे राजस्थानातील भडला गावानं देशाची सौरऊर्जा राजधानी म्हणण्याइतपत घेतलेली झेप…खेरीज सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही खटपट केवळ सरकारपुरती मर्यादित राहिलेली नसून ‘हरित ऊर्जानिर्मिती’च्या प्रवाहात ‘टाटा’, ‘अदानी’, ‘रिलायन्स इंडस्ट्रिज’, ‘जेएसडब्ल्यू’ अशा दिग्गज उद्योग समूहांनी नेटानं उडी घेतलीय…
‘जिओ’च्या यशाच्या पुनरावृत्तीचं स्वप्न..
‘रिलायन्स इंडस्ट्रिज’चा ‘ग्रीन एनर्जी’ (हरित ऊर्जा) उद्योग येऊ घातलेल्या बारा महिन्यांत भारतीयांना धडक देणार असून कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांच्या मतानुसार, त्याच्यात क्षमता असेल ती येत्या पाच ते सात वर्षांत त्यांच्या आस्थापनाच्या सध्याच्या सर्व विभागांना सहज मागं टाकण्याची…‘आरआयएल’नं भागधारकांसाठी तयार केलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 च्या अहवालात म्हटलंय, ‘येऊ घातलेल्या बारा महिन्यांत कंपनीनं ‘ग्रीन एनर्जी’च्या विविध गटांत केलेल्या गुंतवणुकीचं दर्शन जनतेला घडणार असून त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांत पाहायला मिळेल ती सातत्यानं वृद्धीच’…‘रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड’नं ‘ग्रीन एनर्जी’ उद्योगाला प्रारंभ केला तो गेल्या आर्थिक वर्षामध्ये. आस्थापनानं सुरुवातीला तीन वर्षांसाठी तब्बल 10 अब्ज डॉलर्स ओतण्याचा निर्णय घेतलाय. मुकेश अंबानींच्या शब्दांत सांगायचं झाल्यास कुठलंही नवीन तंत्रज्ञान समाजाला परवडण्याजोगं असणं अतिशय महत्त्वाचं असून गरज आहे ती त्यानं लोकांना लाभ मिळवून देण्याची…
‘रिलायन्स’नं या मार्गावरून प्रवास सुरू केलाय तो एक निश्चित लक्ष्य डोळय़ांसमोर ठेवूनच. आस्थापनाला ‘वायरलेस ब्रॉडबँड’च्या यशाची पुनरावृत्ती इथं घडवायचीय…‘भारतात दर्शन घडतंय ते विश्वातील सर्वांत स्वस्त ‘वायरलेस ब्रॉडब्रँड’चं अन् हे दशक संपेपर्यंत ‘ग्रीन एनर्जी’च्या बाबतीत सुद्धा तसंच घडेल. कंपनी सौरऊर्जेपासून ‘ग्रीन हायड्रोजन’पर्यंतच्या अपारंपरिक उर्जेच्या प्रत्येक गटात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यास नि त्यांच्या वितरणासाठी सज्ज झालीय. प्रत्येकाला स्वच्छ ऊर्जा कमी किमतीत देणं हे आमचं ध्येय’, मुकेश अंबानी सांगतात…या पार्श्वभूमीवर आस्थापनानं विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांत गुंतवणूक केलेली असून नॉर्वेत मुख्यालय असलेली ‘सोलर पॅनल्स’ची निर्मिती करणाऱया ‘आरईसी सोलर’चं अधिग्रहण केलंय. त्याशिवाय 40 टक्के हिस्सा खिशात घातलाय तो ‘स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी’चा तसंच अमेरिकेच्या ‘हायड्रोजन तंत्रज्ञाना’साठी प्रसिद्ध असलेल्या ‘चार्ट इंडस्ट्रिज’शी सुद्धा हस्तांदोलन केलंय…
‘जेएसडब्ल्यू’ची झेप…
‘जेएसडब्ल्यू एनर्जी’नं ‘मैत्राह एनर्जी’च्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचं 10 हजार 531 कोटी रुपयांना अधिग्रहण करण्याचं ठरविलंय. ‘जेएसडब्ल्यू एनर्जी’चं हे अजूनपर्यंतचं सर्वांत मोठं पाऊल. त्यामुळं कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेत 35 टक्क्यांनी वृद्धी होऊन ती पोहोचणार 6.5 गिगावॉटवर (जीडब्ल्यू)…आस्थापनाचं लक्ष्य आहे ते ‘शून्य उत्सर्जना’च्या दिशेनं प्रवास करण्याचा. ‘मैत्राह’च्या अपारंपरिक ऊर्जा विभागात समावेश आहे तो आठ पवनचक्क्यांचा आणि तीन सौरऊर्जा युनिट्सचा…आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ‘मैत्राह’ कंपनीनं 1 हजार 467 कोटी रुपयांचा महसूल मिळविलाय. ‘जेएसडब्ल्यू’नं म्हटलयं या अधिग्रहणामुळं त्यांना एकूण क्षमतेच्या 65 टक्के अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करणं (सध्या 57 टक्के) शक्य होईल…
कंपनी स्वप्न पाहतेय ते दशक संपण्यापूर्वी अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती 85 टक्क्यांवर वा 20 गिगावॉटवर नेण्याची. ‘जेएसडब्ल्यू एनर्जी’ ही अब्जाधीश उद्योगपती सज्जन जिंदाल यांची कंपनी असून त्यांनी ‘मैत्राह’बरोबरचा करार त्यांची 100 टक्के हिस्सेदारी असलेली ‘निओ एनर्जी’च्या साहाय्यानं केलाय. जिंदाल यांना आता वाट पाहावी लागेल ती भारताच्या ‘अँटीट्रस्ट अधिकारिणी’ व ‘मैत्राह’च्या कर्जदारांच्या ‘ग्रीन सिग्नल’ची. हा व्यवहार नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत पूर्ण होणार अशी ‘जेएसडब्ल्यू’ला आशा वाटतेय. ‘मैत्राह एनर्जी’ची नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकात स्थापना केली होती ती रवी कैलास यांनी. त्यांच्या खिशात 1.75 गिगावॉट अपारंपरिक ऊर्जा असून करारानुसार, या क्षेत्रातील त्यांच्याकडील सर्व तज्ञांचं मार्गदर्शन ‘जेएसडब्ल्यू’ला मिळेल…
‘टाटा समूह’ही आघाडीवर…
‘हरित ऊर्जे’च्या शर्यतीत दिग्गज ‘टाटा समूह’ देखील उतरलेला असून या क्षेत्रातील एक तगडा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘टाटा पॉवर’ येत्या पाच वर्षांत अपारंपरिक ऊर्जा व्यवसाय क्षमतेचा विस्तार घडविण्यासाठी 75 हजार कोटी रुपये गुंतविणार. 2022-23 मध्ये आणखी 10 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून त्यामुळे चालू आर्थिक वर्षातील एकूण भांडवली खर्च 14 हजार कोटी रुपयांवर जाईल…‘टाटा पॉवर’ या क्षेत्रातील आपलं उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेनं नेटानं वाटचाल करत असून 2021-22 आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा क्षमतेत 707 मेगावॉटची भर घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं त्यांची स्वच्छ व हरित ऊर्जेची क्षमता 34 टक्क्यांवर पोहोचलीय अन् ती पुढील पाच वर्षांत 60 टक्क्यांवर नेण्याचा संकल्प कंपनीनं सोडलाय…‘टाटा पॉवर’ हे या क्षेत्रातील ‘नेट कार्बन झिरो’ उद्दिष्ट जाहीर करणारं पहिलं आस्थापन…
‘टाटा पॉवर’ तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्हय़ात 4 गिगावॉट ‘सोलर सेल’ नि ‘सोलर मॉडय़ुल’चं उत्पादन करणारा प्रकल्प उभारणार असून त्याकरिता 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. यासंदर्भात नुकताच त्यांनी तामिळनाडू सरकारशी सामंजस्य करार केलाय…हरित तंत्रज्ञानातील गुंतवणूक नि अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या बाबतीत ‘टाटा पॉवर’ला प्रणेते म्हटल्यास ते वावगं ठरू नये. त्यांनी आपली पहिली सौरऊर्जा उत्पादन सुविधा स्थापन केली होती ती पार 1991 साली…
एकेकाळचं खेडं…आज भारताची सौरऊर्जा राजधानी…
n एखादा साधा रस्ता, पाणी, वीज वा अन्य कुठल्याही सोयी नसलेलं आणि जोधपूरपासून 220 किलोमीटर्सवर असलेलं भडला हे राजस्थानमधील एक उपेक्षित गाव…खुद्द त्या राज्यातील लोकांनाच फारसं माहीत नसलेलं. वाळवंटात वसलेलं, 50 डिग्री सेल्सियसपर्यंत तापमान पोहोचणारं अन् सूर्याच्या रखरखीत किरणांत त्वचा अक्षरशः भाजून काढणारं…शिवाय तिथं फारच थोडा पाऊस पडतोय…
n पण अचानक त्या गावचे दिवस फिरलेत. आता सहा हजार हेक्टर्समध्ये दर्शन घडतंय ते चकाकणाऱया निळय़ा ‘ग्रिड्स’चं, शिस्तबद्ध रांगेत उभ्या असलेल्या असंख्य ‘सिलिकॉन सोलर पॅनल्स’चं…आज भडलाला फक्त भारतच नव्हे, तर सारं विश्व ओळखतंय. कारण चीनच्या ‘गुलमंड सोलर पार्क’नंतर तो ठरलाय जगातील दुसऱया क्रमांकाचा सौरऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प…
n दरदिवशी तिथं निर्माण होतेय तब्बल 2 हजार 245 मेगावॉट सौरऊर्जा. या प्रकल्पानं भारतातील 40 टक्के ऊर्जेच्या वापराला आपरंपरिक ऊर्जेच्या दिशेनं वळविलंय. भडला म्हणजे ‘नवीन भारतातील यशस्वी घटना’ असं वर्णन सहज करता येईल…
n नरेंद्र मोदी सरकारनं भडलाला वगळून 500 गिगावॉटची निर्मिती करण्याचं लक्ष्य डोळय़ांपुढं ठेवलं होतं. परंतु ते शक्य नाहीये…‘पार्क’ची सुरुवात केली ती 2013 साली राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, ‘यूपीए’ सरकारच्या ‘जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन’च्या अंतर्गत. पहिल्या पार्कची क्षमता होती ती फक्त 70 मेगावॉट…
n 2014 साली सत्ता मिळविल्यानंतर मोदी प्रशासनानं अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीचं लक्ष्य 2022 पर्यंत 1 लाख मेगावॉटवर पोहोचविलं, परंतु ते ‘टार्गेट’ सुद्धा अशक्यच ठरलंय. तरी देखील भारत वापरत असलेल्या सर्व प्रकारच्या 3.95 लाख मेगावॉट विजेत देशातील एकूण सौरऊर्जेचा वाटा पोहोचलाय तब्बल 55 हजार मेगावॉटवर…
n सुरुवातीला कंपन्यांवर प्रति युनिट 6 रुपये 45 पैसे दरानं ही वीज खरेदी करण्याची पाळी यायची. परंतु त्यानंतर हा दर प्रति युनिट 2 रुपये 45 पैशांपर्यंत उतरला. सध्या सौरऊर्जेचा दर ‘सोलर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ ‘ई-ऑक्शन’च्या साहाय्यानं ठरवतेय…गुजरात राज्यात तर हा दर 2 रुपये प्रति युनिटहून खाली पोहोचलाय…
n भडलानं 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला खेचलंय आणि आता इतरांनीही त्या पार्कच्या बाहेर 1500 मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मितीला प्रारंभ केलाय…
n भडला आता पूर्वीचं गाव राहिलेलं नाहीये. तेथील जमिनीची किंमत दहा पटींनी वाढलीय. दहा वर्षांपूर्वी एका हेक्टरची किंमत 2 हजार 500 रुपये होती नि ती आता 2.5 लाखांवर पोहोचलीय…जमिनीचा तुकडा न विकता तो एखाद्या आस्थापनाला लीजवर देणाऱया शेतकऱयाला दशकापूर्वी वर्षाला 5 हजार रुपये मिळायचे. ही रक्कम आता 25 हजारांवर गेलीय…तरी देखील गावकऱयांच्या मते, त्यांना अपेक्षेनुसार फायदा मिळालेला नाहीये. पाणी हा तेथील सर्वांत मोठा प्रश्न असून मिळणाऱया बऱयाचशा पाण्याचा उपयोग होतो तो ‘सोलर पॅनल्स’ स्वच्छ करण्यासाठी शिवाय बकऱया, मेंढऱया, गुरं यांना चरण्यासाठी जागा फारच कमी राहिलीय…
अदानींचं ‘सौरऊर्जा’ प्रेम…
n 2019 ः ‘अदानी ग्रीन एनर्जी’नं ‘एस्सेल ग्रुप’ची 205 मेगावॉट सौर मालमत्ता 1 हजार 300 कोटी रुपयांना विकत घेतली…
– ‘कतार इन्व्हेस्टमेंट ऑथोरिटी’ची ‘अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई’मध्ये 3 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक…
n 2020 ः ‘अदानी ग्रीन एनर्जी’चा ‘टोटल’समवेत 2.1 गिगावॉटसाठी संयुक्त प्रकल्प. त्यामुळं ‘अदानी’ यांना 3 हजार 707 कोटी रुपये मिळाले…
n 2021 ः ‘अदानी ग्रीन’नं ‘स्टर्लिंग अँड विल्सन’ची 75 मेगावॉट सौर मालमत्ता आणि ‘स्कायपॉवर ग्लोबल’ची 50 मेगावॉट सौर मालमत्ता विकत घेतली…
– त्याचवर्षी भारतातील अपारंपरिक उर्जा क्षेत्रातील सर्वांत मोठं अधिग्रहण पाहायला मिळालं. ‘अदानी’नं ‘एसबी एनर्जी’चा 5 गिगावॉट अपारंपरिक ऊर्जा विभाग 3.5 अब्ज डॉलर्सना विकत घेतला. ‘एसबी एनर्जी इंडिया’ हा जपानची ‘सॉफ्टबॅक’ (80 टक्के हिस्सा) नि सुनील भारती मित्तलांचा ‘भारती समूह’ (20 टक्के) यांचा संयुक्त उपक्रम…
n 2022 ः ‘इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनी’चा ‘अदानी कंपनी’च्या ग्रीन पोर्टफोलिओमध्ये 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक…
(‘अदानी एंटरप्राइझेस’नं पुढील दहा वर्षांत अपारंपरिक ऊर्जापुरवठा साखळीत 20 अब्ज डॉलर्स म्हणजे एकूण 48 हजार कोटी रुपये गुंतविले जाणार असल्याचं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घोषित केलं होतं. त्यात समावेश राहील तो ऊर्जानिर्मिती, वहन आणि वितरण यांचा)…
संकलन ः राजू प्रभू