यावर्षी तरी खोदाई होणे आवश्यक, पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होणार का? : तातडीने काम सुरू करण्याची शेतकऱ्यांतून मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बळ्ळारी नाला म्हणजे दरवर्षीच शेतकऱ्यांना एक मोठा व्याप झाला आहे. पेरणी करायची की नाही? असा प्रश्न दरवर्षीच शेतकऱ्यांना पडत आहे. अतिपावसामुळे शेकडो एकर जमिनीतील पीक कुजून जात आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्याची खोदाई होणे गरजेचे आहे. बळ्ळारी नाल्यामधील जलपर्णी तसेच गाळ आतापासूनच काढला पाहिजे. अन्यथा पावसाला सुरुवात झाल्यानंतर या नाल्याचे काम करणे अशक्य होणार आहे. तेव्हा तातडीने नाला साफ करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
बळ्ळारी नाल्याला दरवषी पूर येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. पावसाळ्dयात बळ्ळारी नाल्याला यावषीही तीनवेळा पूर आला होता. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. पावसाने शहापूर, येळ्ळूर, धामणे, वडगाव, अनगोळ शिवारातील वाढलेल्या भातामध्ये पाणी शिरले होते. पेरणी केल्यानंतर सुरुवातीलाच या शिवारात पाणी भरल्याने भातपीक कुजून गेले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा भात लावणी केली होती. त्यानंतरही जोरदार पाऊस झाला आणि भातपीक पाण्याखाली गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोनवेळा मोठे नुकसान झाले. अशीच परिस्थिती राहिल्यास यावर्षीही फटका बसणार आहे.
दरम्यान यावर्षी आनंदनगरपासून बळ्ळारीपर्यंत मोठ्या नाल्याची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पाणी थेट बळ्ळारी नाल्याला जाणार आहे. मात्र बळ्ळारी नाल्याची खोदाई केली नाही तर या पाण्याला जाण्यासाठी पुढे वाटच नाही. त्यामुळे हे सर्व पाणी शिवारामध्ये शिरणार आहे. परिणामी शिवारातील पिकेही खराब होणार आहेत. तेव्हा याचा कोठे तरी गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. अन्यथा पावसाळ्यात शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार आहे.
बळ्ळारी नाला शेतकरीवर्गासाठी अतिशय तापदायक ठरू लागला आहे. कारण नाला पूर्णपणे गाळाने आणि जलपर्णीने व्यापला आहे. त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी नाल्यातील पाणी शिवारामध्ये जात आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गेल्या काही वर्षांपासून दरवर्षीच फटका सहन करावा लागत आहे. तरीही प्रशासनाला शेतकऱ्यांची चिंता आणि आत्मियता नसल्यामुळे फक्त पाहणीचे नाटक करण्यात येत आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बळ्ळारी नाल्याची खोदाई करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला दिले होते. मात्र अजून तरी याबाबत कोणत्याच हालचाली सुरू करण्यात आल्या नाहीत.
बळ्ळारी नाल्याला लागूनच हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी मोठा भराव टाकण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेकांनी आपल्या जमिनीमध्ये मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होणे अवघड होणार आहे. तेव्हा आता पाटबंधारे खात्याने तातडीने या नाल्याची खोदाई करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे. जानेवारी महिना संपत आला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाला सुरुवात होण्यास केवळ दीड-दोन महिनेच उरले आहेत. तेव्हा तातडीने कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षीच फटका…
एकीकडे सुपीक जमिनी नापीक दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे वडगाव, शहापूर आणि बेळगाव परिसरातील दुबार पिके देणारी शेतजमीन पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षीच फटका बसत आहे. हलगा-मच्छे बायपाससाठीही जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचबरोबर दडपशाही करत शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये माती टाकून देण्यात आली आहे. सध्या हा खटला न्यायप्रविष्ट आहे. तसेच शेतकऱ्यांच्या बाजूनेच सर्व निकाल लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. असे असले तरी पूर येवू नये यासाठी बळ्ळारी नाल्याची खोदाई होणे नितांत गरजेचे आहे. तेव्हा तातडीने या नाल्याच्या खोदाईला सुरुवात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.