ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशात दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. हा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी हजारो अधिकाऱ्यांची टीम कार्यरत असते. अर्थसंकल्प तयार करताना कमालीची गुप्तता पाळली जाते. कोणतीही माहिती लीक होऊ नये, यासाठी जवळपास 10 दिवस हे अधिकारी बंदिवासात असतात. त्यांचा घर आणि जगापासून संपर्क तुटलेला असतो.
केंद्राचा अर्थसंकल्प शेकडो अधिकाऱ्यांची टीम तयार करत असते त्यासाठी विविध उद्योगांच्या संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून माहिती मागवली जाते. त्यानंतर बजेट तयार होत असते. या बजेटला अंतिम रुप देण्यासाठी संबंधित सर्व अधिकारी जवळपास 10 दिवस बंदिवासात असतात. म्हणजेच 14 हजार 400 मिनिट हे अधिकारी सरकारच्या ‘नजरकैदेत’ असतात. बजेट तयार करणाऱ्या टीमशिवाय त्याच्या छपाईशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील बाहेर येण्याची किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना भेटण्याची परवानगी नसते. अर्थमंत्र्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांनाच घरी जाण्याची परवानगी असते.
अर्थसंकल्प तयार करताना 10 दिवस आगोदर तेथील इंटरनेट वापरावर बंदी घातली जाते. ज्या संगणकांत बजेट दस्तऐवज आहेत, त्याला इंटरनेट आणि NIC सर्व्हरपासून वेगळे केले जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या हॅकिंगची भीती नसते.