सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही जुमानत नाहीत अधिकारी
प्रतिनिधी/ पणजी
एखाद्या प्रकरणात कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रारी दिलेल्या हव्या असतात. अन्यथा ते कारवाई करत नाहीत, असे दिसून आले असून असे प्रकार सध्या वाढीस लागले आहेत.
बुलेटच्या मोडीफाईड सायलन्सरमुळे नागरिकांना सहन करावे लागणारे त्रास, मशिदींवर वाजणारे अजानचे भोंगे यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सक्त आदेश दिलेले आहेत. तसेच धुळीमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाची अधिकारी स्वेच्छा दखल घेऊन कारवाई करू शकतात. परंतु वाईटपणा नको म्हणून प्रत्येकजण त्याकडे कानाडोळा करतात आणि लोक तक्रार करत नाहीत म्हणून आपण कारवाई करत नसल्याचा निर्वाळा देतात.
हल्लीच मडगाव वाहतूक पोलिसांनी 50 पेक्षा जास्त बुलेट दुचाकी जप्त केल्या होत्या. मोडीफाईड सायलन्सर्स बसवून आवाजाचे प्रदूषण करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे तेथील निरीक्षक गौतम साळुंखे यांनी सांगितले होते. त्यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सदर प्रकरणी शहरातील अनेक ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिकांनी आपणाजवळ तक्रारी केल्या होत्या म्हणूनच कारवाई केल्याचे सांगितले होते.
प्रत्यक्षात बुलेटच्या मोडीफाईड सायलन्सरबद्दल यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सक्त आदेश जारी करून कारवाई करण्यास सांगितले आहे. परंतु वाहतूक पोलीस आणि वाहतूक खातेही या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एवढेच नव्हे तर त्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या आरटीआय अर्जाला उत्तर देताना सुद्धा राज्यातील 12 ही वाहतूक कार्यालयांनी (अपवाद वगळता) एकाही बुलेटवर कारवाई केली नसल्याचे उत्तर दिले आहे. यावरून सदर अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा अंदाज येतो.
दरम्यान, एकाच प्रकारात एका जिह्याचा अधिकारी कारवाई करतो तर दुसऱ्या जिह्याचा अधिकारी बघ्याची भूमिका घेतो, असे चित्र दिसून आले आहे. सध्या उत्तर गोव्यातही मोडीफाईड बुलेटच्या आवाजामुळे लोक हैराण झालेले आहेत. रात्री अपरात्री आणि पहाटेसुद्धा अशा बुलेटस् गावातून धडधडत जातात तेव्हा शांतताभंग तर होतोच, शिवाय अबालवृद्धांची झोपमोडही होते. परंतु उत्तर गोव्यात अद्याप अशा दुचाकींवर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आलेले नाही. यावरून या अधिकाऱ्यांनी नागरिकांकडून तक्रारींची अपेक्षा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मशिदींवरील भोंगे ठरतायत त्रासदायक
दुसऱ्या प्रकारात अजानदरम्यान मशिदींवर वाजणाऱ्या भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासा भाग पाडावे व गैरप्रकार दृष्टीस पडल्यास कारवाई करावी, असे न्यायालयांनी वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. तरीही न्यायव्यवस्थेला गृहित धरून मशिदीकडून जोरदार आवाजाने भोंगे वाजविण्यात येत आहेत. कहर म्हणजे कोणतीही अधिकारीही याप्रकरणी कारवाईसाठी पुढे येत नसल्याने अनेक भागात कायदाच अस्तित्वात नाही की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे.
इमारत बांधकामामुळे धूळ प्रदूषणाने माखला पाटो परिसर
अन्य अशाच एका प्रकरणात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भूमिकाही बेजबाबदारपणाची दिसून आली आहे. पाटो येथे एका खासगी प्रकल्पाच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम हाती घेण्यात आले आहे. मोठमोठ्या अवजड यंत्रणांचा आवाज आणि डझनावरी ट्रकांच्या वाहतुकीमुळे पाटो भागाला एखाद्या खाण परिसराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नागरिकांना तर त्या भागात चालणेही मुश्किल बनले आहे. तेथील मोठमोठ्या अत्याधुनिक इमारती धुळीने माखल्या आहेत. नव्या कोऱ्या हॉटमिक्स रस्त्यांची अक्षरश: धुळधाण झालेली आहे. युद्धपातळीवर चाललेल्या या इमारतीची बांधकाम प्रक्रिया भल्या पहाटे चार वाजल्यापासूनच प्रारंभ होते. त्यामुळे अवजड यंत्रांचा घणघणाट पार आल्तिनोपर्यंत ऐकू येतो. त्यातून लोकांची झोपमोड होते.