कसबा बीड/प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे ओढ्याची उंची वाढवण्याचे काम खूप दिवस झाले सुरू आहे.यामध्ये ओढ्याची उंची वाढवून मुरूम टाकण्यात आला होता. पण शिरोली दुमाला हे मध्यवर्ती गाव असल्याने या ओढ्यावरून जाण्यासाठी बाचणी, हिरवडे, सडोली, सावर्डे दुमाला, मांडरे, गर्जन, चाफोडी, घानवडे आदी गावातील वाहतूक सुरू असते. तसेच साखर कारखान्याची ऊसाने भरलेली अवजड वाहतूक या मार्गावरून सुरू असते. त्यामुळे मुरमाचे खच्चीकरण होऊन धुळीतून ओढ्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रसंगी काही किरकोळ अपघात सुद्धा झालेले आहेत. तसेच ओढ्याच्या आसपास असणाऱ्या लोकवस्तीतील लोकांचा धुळीमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे.अशा खराब रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे .मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनास जाग येते का ? असा प्रश्न वाहतूक करणाऱ्या छोट्या मोठ्या प्रवासांच्या व ग्रामस्थांच्या मनात निर्माण होत आहे.
या सर्व वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिरोली ग्रामस्थांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख एस. आ.र पाटील यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये शिरोली दुमाला ओढ्यावरील रस्ता डांबरीकरण व्हावे असे नमूद करण्यात आले.रस्ता डांबरीकरण न झालेस 26 जानेवारी रोजी सामुदायिक रास्ता रोको व आत्मदहनाचा लेखी इशारा देण्यात आला आहे.यावेळी शिरोली दुमाला येथील आनंदराव पाटील ,एस. के. पाटील ,मधुकर यादव,संजय सदाशिव पाटील,दत्तात्रय कांबळे,शामराव देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून शिरोली दुमाला ओढयाची उंची वाढवली पाहिजे,व उंची वाढविल्यानंतर रस्ता चांगला झाला पाहिजे,यासाठी वेळोवेळी सूचना केल्या होत्या.त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली होती.याबाबत शिरोली ग्रामस्थांच्याकडून दैनिक तरुण भारतचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. आता रस्ता डांबरीकरण राहिलेला विषय पूर्ण करण्यासाठी लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे देण्यात आले आहे, असे माजी सरपंच एस. के. पाटील यांनी सांगितले.