केरी स्टेट बँक लूट प्रकरणानंतर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नसल्याचे उघड : प्रत्येक बँकेत सीटीटीव्ही यंत्रणेसह सशस्त्र सुरक्ष रक्षकाची गरज
प्रतिनिधी /वाळपई
दोन दिवसांपूर्वी केरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकाचे अपहरण करून बँकेतील रोकड व सोन्याचे दागिने मिळून लाखो रुपयांचा ऐवज लुटला. ज्या पद्धतीने चोरीचे प्रकरण घडले ते पाहिल्यास सदर बँकेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शाखेत सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात केला नव्हता. जर याठिकाणी शस्त्रधारी सुरक्षा रक्षक असता तर चोरीची घटना घडली नसती. केरी येथील या बँकेमध्ये घडलेल्या लुटीच्या प्रकरणामुळे आता सत्तरी तालुक्यासह राज्यातील अन्य बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रामुख्याने चर्चेत आलेला आहे. या संदर्भात गांभीर्य लक्ष देण्याची मागणी खातेदारांसह नागरिकांनी केलेली आहे.
बँपेंची सुरक्षा यंत्रणा तकलादू?
वास्तविक बँकांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक बँकेमध्ये 24 तास शस्त्रधारी सुरक्षा रक्षक तैनात करणे गरजेचे असते. सामान्यपणे लोकांचा राष्ट्रीयीकृत बँकांवर विश्वास आहे. राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आपले पैसे किंवा सोन्याचे दागिने असतील तर ते सुरक्षित आहेत, असा समज तमाम खातेदारांचा असतो. मात्र ज्या पद्धतीने केरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये चोरीचा प्रयत्न झाला ते पाहिल्यास राष्ट्रीयकृत बँकेची सुरक्षा तकलादू स्वरुपाची असल्याचे समोर आले आहे.
केरी येथील स्टेट बँक शाखेत सीसीटीव्ही यंत्रणा बसविलेली आहे. मात्र येथे बँकेमध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षक 24 तास तैनात करण्याची गरज आहे.
सुरक्ष यंत्रणा मजबूत असण्याची गरज
प्रत्यक्षात अनेक राष्ट्रीयीकृत त्याचप्रमाणे राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या बँकेमध्ये सुरक्षा रक्षक नसल्याचे चित्र आहे. चोरी झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास यंत्रणा जागृत होत असते व त्यानंतर चोरीचा तपास करून संशयिताना गजाआड करण्यात येत असते. मात्र बँकांमध्ये चोरी होऊ नये, यासाठी सुरक्षा रक्षकांची यंत्रणा अधिक मजबूत करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
बँकेतील लोकांचे पैसे, दागिने सुरक्षित आहेत का?
बँकेची सुरक्षा यंत्रणा मजबूत नसेल खातेदारांचा विश्वास बँकेवर कसा राहणार? असा सवाल खातेधारक व नागरिकाकडून उपस्थित होत आहे. कारण बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा करताना व बँकेच्या सुरक्षा पेटीमध्ये आपले सोन्याचे दागिने ठेवताना खातेदार हजार वेळा विचार करीत असतात. दरम्यान, स्थानिक पोलीस यंत्रणेकडून सर्व बँकांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. मात्र केरी येथील स्टेट बँकेच्या शाखेने यांची अंमलबजावणी का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आता बँक लुटल्यानंतर सरकारची यंत्रणाही खडबडून जागी झाली. तरीसुद्धा बँकेमधील सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टिने खरोखरच प्रयत्न होतील का? अशा प्रकारचा सवाल आता खातेधारकांनी उपस्थित केलेला आहे.
सर्व बँकांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याची हमी खातेधारकांना द्यावी, अशी मागणी खातेदारांनी केलेली आहे ?.प्रत्येक बँकांनी सीसीटीव्हीसोबत बँकेच्या एकूण मालमत्तेची काळजी घेणारा सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात करण्याची नितांत गरज असल्याचे मत अनेक खातेधारकांनी व्यक्त केले आहे.