सुधाकर काशीद
अतिशय चपळ वेगवान मानल्या जाणाया चित्त्याचे 60-70 वर्षांपूर्वी भारतातील अस्तित्व संपले.आणि पुन्हा आता ना मेबियातून आठ चित्ते भारतात उद्या आणले जात आहेत. त्यांचे आपल्या देशात पुन्हा संवर्धन करण्याची ही महत्वाकांक्षी योजना आहे. जरूर वन्यजीवन विश्वातील ही एक वेगळी घडामोड आहे. पण या निमित्ताने “चित्ता आणि आपले कोल्हापूर” या साहसी नात्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. आज चित्ता भारतात परत आणण्याची प्रक्रिया खूप चर्चेची असली तरी एकेकाळी चित्त्याचे संवर्धन संरक्षण व त्याच्याकडून करून घेतली जाणारी शिकार याचे कोल्हापूर हे मोठे केंद्र होते याची या निमित्ताने नव्या पिढीला माहिती होण्याची गरज आहे.
आज नामेबियातून आठ चित्ते भारतात आणले जात असले तरी कोल्हापुरात 100, 125 वर्षापुर्वी 60 ते 70 चित्ते होते. व आज आपण एसटी स्टँड जवळ विक्रम हायस्कूल म्हणून ओळख असलेल्या वास्तुत हे चित्ते ठेवले जात होते. व आज शिवाजी पार्क म्हणून अतिशय उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण त्या काळी उघडा माळ असलेल्या परिसरात हे चिते त्यांच्या सरावासाठी फिरवले जात होते.राजर्षी शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात कोल्हापूर हे साहशी खेळासाठी कसे प्रसिद्ध होते याचेच या चित्त्यांच्या रूपाने एक प्रतिक मानले जात होते.
साधारण शंभर सव्वाशे वर्षापूर्वी रेल्वे स्टेशन ते कावळा नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर मोठय़ा मोठय़ा खणी होत्या. एका बाजूला टेंबलाबाई टेकडी पर्यंत पसरलेला विस्तीर्ण माळ होता. आता जिथे एसटी स्टँड आहे त्या परिसरात ही दोन मोठी खणी होत्या.आणि या परिसरात दोनच वास्तू होत्या. त्यापैकी एक स्टेशन बंगला होता. आणि दुसरा वाघ नाका होता. हा वाघ नका म्हणजे आत्ताचे विक्रम हाय स्कूल. या ठिकाणी चित्ते ठेवलेले असायचे. सकाळी सहाला या वाघ नाक्याची दारे उघडायची. आणि चक्क साखळीला चित्ते बांधून चित्तेवाण त्यांना घेऊन बाहेर पडायचे. एखादा कुत्रा फिरायला न्यावा त्या सहजतेने चित्ते साखळीला बांधून ते या परिसरातून फिरवायचे. पळण्याचा व्यायाम द्यायचे. दहा ते पंधरा संख्येने असलेले चित्ते तासात दीड तासाने पुन्हा नाक्यात बंद व्हायचे.व्यायाम, मनाची एकाग्रता, व संयम या तिन्ही दृष्टीने शिकारीचा शौक महाराजांनी बाळगला होता. घोडय़ांच्या शर्यतीत पैसे लावून जुगार खेळण्यापेक्षा मन मनगट व शौर्याचा हा शौक त्यांनी महत्त्वाचा मानला होता.?
शाहू महाराजांनी त्यांचे जिवाभावाचे मित्र भावनगरचे भावसिंगजी महाराज यांच्या समवेत भावनगर येथे चित्त्याचे संवर्धन व त्यांच्याकडून केली जाणारी काळवीटाची शिकार पाहिली व त्यांनी हा साहसी खेळ कोल्हापुरात आणला चित्ता मानवी वस्तीत ठेवणे म्हणजे तसे खूप जोखमीचे त्यामुळे त्यांनी स्टेशन रोड ते कावळा नाका रस्त्यावर त्या काळी निर्मनुष्य असलेल्या वाघ नाक्यात चित्ते ठेवले सरदार मुन्ना खान, इस्माईल रहमान जमादार चित्तेवाण, दस्तगीर इस्माईल चित्तेवाण, बाबालाल उस्मान पठाण व बावडय़ाचे धोंडी लिंबाजी पाटील हे या चित्त्यांच्या देखभालीतले साहसी वीरचित्त्याच्या देखभालित प्रमुख होते.
वाघ नाक्यात ठेवलेल्या या चित्यांना माणसाळाचे अजब काम ते करायचे. चित्ता थोडा माणसाळला की त्याला फिरवायला न्यायचे. जन्मजात शिकारीचे ज्ञान असलेल्या चित्याला ते असे प्रशिक्षण द्यायचे की काळवीटाच्या दिशेने चित्ता धावायचा. सावज त्याच्या टप्प्यात यायला फारसा वेळ लागायचा नाही. चित्ता सावजा वर झेप घेऊन त्याला जमिनीवर लोळवायचा. पण त्याला प्रशिक्षण असे दिले जात होते की चित्ता त्या सावजाचा कधीच फरशा पडायचा नाही. रक्त व मांसाची चटक असलेला किंबहुना रक्त आणि मांसासाठी झोपेतूनही उठणारा चिता या सावजासमोर मात्र निमुटपणे बसून राहायचा.तळंदगे, रायबाग, रूकडी, पट्टणकोडोली, शेडबाळ मिरज या ठिकाणी खुरटय़ा गवताच्या माळावर काळवीट असायचे व या काळवीटांची शिकार या चित्यांच्याकडून करून घेतली जायची.
चित्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून शिकार करून घेण्याचा हा साहसी खेळ विशेष करून देशातल्या अन्य भागातून कोल्हापुरात पाहुणे म्हणून आलेल्या संस्थानिकांना, ब्रिटिश अधिकाऱ्यांना दाखवला जायचा.आणि त्याकाळी अशा साहसी खेळाच्या यादीत शाहू महाराज व राजाराम महाराजांच्यामुळे कोल्हापूरचा अतिशय ठळकपणे उल्लेख होत होता. अलिकडे छत्रपती शहाजी महाराजांच्या काळापर्यंत चित्ते कोल्हापुरात होते. साहसी खेळाचे आगर असलेल्या कोल्हापुरची ते साक्षच होते.
कोल्हापुरात अफ्रिकेहून चित्ते…
शाहू महाराजांनी अफ्रिकेहून चित्ते आणायला बावडय़ाच्या धोंडी लिबांजी पाटील यांना पाठवले होते.
कोल्हापुरात दसरा मिरवणुकीत चित्ते…
दस्रया दिवशी कोल्हापुरात लवाजमा निघायचा. त्यातून कोल्हापूर संस्थानच्या लष्करी ताकदीचे प्रदर्शनही व्हायचे. या लवाजम्यात दोन चिते एका गाडय़ावर बसवले जायचे . अर्थात गर्दीत ते बिथरू नयेत म्हणून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असायची.चित्याचे पुन्हा संवर्धन होत आहे . वन्य जीव दृष्टया ही मोठी घडामोड आहे . चिता आणि को लहापूर याचे खूप जुने नाते आहे.
गणेश नेर्लेकर
चित्ता अभ्यासक