तस्करीसाठी आलेला ठाण्यातील
प्रतिनिधी / मिरज
शहरातील ग्रामीण एसटी स्थानकाजवळ मृत बिबट्याच्या कातड्य़ाची तस्करी महात्मा गांधी चौकी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी समीर जयवंत नारकर (वय 32, रा. दिलीप नाखवा चाळ, मीठ बंदर रोड, पिंपळ छाया गणेश मंदिरजवळ, ठाणे) या संशयीताला सापळा लावून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून पाच लाख, 25 हजार रुपये किंमतीचे बिबट्य़ाचे कातडे जप्त करण्यात आले आहे. गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. सदर बिबट्य़ाचे कातडे तो कोणाला विकणार होता? याबाबत तपास सुरू आहे.
महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मिरज ग्रामीण एसटी स्थानकाजवळ कोणत्या तरी जनावरच्या कातड्य़ाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गांधी चौकी पोलीस आणि वनविभागातील अधिकाऱ्याच्या पथकाने स्टँड परिसरात सापळा लावला. ग्रामीण एसटी स्थानच्या पाठीमागच्या बाजूस समीर नारकर हा तरुण हातात फ्लॅस्टीकची पिशवी घेऊन थांबला होता. पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी करुन झडती घेतली असता पिशवीमध्ये बिबट्य़ाचे कातडे दिसून आले. या कातड्य़ाबाबत विचारणा केली असता त्याने विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
वन विभागातील अधिकाऱ्यांनी कातड्य़ाचा पंचनामा केला. बिबट्य़ाच्या जबड्य़ापासून शेपटीपर्यंत 146 सेंटी मिटर, पुढील दोन पंजे 57 सेंटी मिटर, मागील दोन पंजे 49 सेंटीमिटर आणि शेपटीची लांबी 54 सेंटीमिटर असा बिबट्य़ाच्या कातड्य़ाचा आकार होता. शिवाय दुर्गंधीमुळे संशय येऊ नये म्हणून कातडय़ाच्या आतील बाजूस हळद व मिठ लावले होते.
हे ही वाचा : अजित पवार यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे; म्हणाले, लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलतायतं आणि तुम्ही…
पोलिसांनी सदर संशयीत तरुणाला ताब्यात घेऊन महात्मा गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वन विभागातील अधिकाऱ्यांनी सदरचे कातडे जप्त केले. या कातड्य़ाची किंमत पाच लाख, 25 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मिरज शहरात यापूर्वी गांडूळ, कासव, घोरपड, हरणाचे शिंग, हस्तीदंतांच्या तस्करी प्रकरणी अनेक कारवाई झाल्या आहेत. पण, बिबट्य़ा सारख्या हिंस्त्र प्राण्याच्या कातड्य़ाच्या तस्करी प्रकरणी पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.