नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने आणलेली ‘एक देश, एक रेशनकार्ड’ ही योजना सर्वसामान्यांचे बळ वाढविणारी आहे, अशी भलावण केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केली आहे. लवकरच या योजनेचे क्रियान्वयन देशभरात पेले जाणार आहे. त्यामुळे देशभरात कोठेही कोणत्याही कुटुंबाला रेशन घेता येणार असून कोणतीही अडचण होणार नाही, हे या योजनेचे वैशिष्टय़ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना काळात केंद्र सरकारने देशातील गरीबांना आतापर्यंत 3.90 लाख कोटी रुपयांचे धान्य विनामूल्य पुरविले आहे. यामुळे गोरगरीबांना मोठाच आधार मिळाला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आता सर्वदूर लोकप्रिय झाली आहे. केंद्र सरकारने 2021-2022 या आर्थिक वर्षात एकंदर 2.75 लाख कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले असून हा एक विक्रम आहे. याशिवाय अंत्योदय अन्न योजना, विनामूल्य धान्य योजना, प्राधान्य घर योजना सुरु आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गरीबाला महिन्याला 5 किलो धान्य दिले जात आहे. आतापर्यंत या योजनेतून 11 कोटी 18 लाख टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेचा सातवा टप्पा सध्या सुरु असून पात्र व्यक्तींना सरकारी सुविधा मिळवून देण्याचे धोरण योग्य रितीने पुढे जात आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.