गेल्या 16 महिन्यात 482 जणांनी प्राण गमविले : 734 जण गंभीर जखमी झाले : वाढती अपघाताची संख्या चिंताजनक : वाहनांचा वाढता वेग चिंताजनक
विनायक जाधव/सांगली
जिल्हय़ात अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या 16 महिन्यात जिल्हय़ात 976 अपघाताची नोंद झाली आहे. त्यामध्ये 482 जणांचा जागीच बळी गेला आहे. तर 734 जण गंभीर जखमी होवून त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. जिल्हय़ात दोनच दिवसापूर्वी पाच अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे या वाढत्या अपघाताच्या वेगाला आता वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलिसांकडून या वाढत्या अपघाताला ब्रेक लावण्यासाठी विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. पण त्या तोकडय़ा पडत चालल्या आहेत.
गेल्या 16 महिन्यात जिल्हय़ात काहीकाळ कोरोनाचा होता. या कालावधीमध्ये नाकाबंदी तसेच लॉकडाऊन होते. अत्यावश्यक सेवा सोडून इतरांना प्रवासाला पूर्णपणे बंदी होती. तरीसुध्दा या कालवधीमध्ये मोठयाप्रमाणात अपघातांची नोंद झाली आहे. त्यामुळे या होणाऱया अपघाताला आता पायबंद कसा घालायचा याचे विवेचन आणि अभ्यास पोलीस यंत्रणेकडून सुरू करण्यात आला आहे. जिल्हय़ातील अनेक ब्लॅक स्पॉट शोधून त्याठिकाणी अपघात होवू नये याची काळजी घेण्यासाठी उपाय करण्यात येत आहेत. पण तरीही याठिकाणी होणारे अपघात मात्र कमी झालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
जिल्हय़ात जानेवारी ते एप्रिल महिन्याअखेर 278 अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये 146 जणांचा जागीच बळी गेला आहे. अवघ्या 120 दिवसाच्या कालावधीमध्ये 146 जणांचा बळी गेला आहे. तर याच अपघातांच्या नोंदीमध्ये 129 जण गंभीर जखमी झाले आहेत. तर आठ जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यामुळे या चार महिन्यांचा विचार केला तर दिवसाला एकापेक्षा अधिक बळी अपघातात जात असल्याचे चित्र समोर येत आहे. सांगली जिल्हय़ातून जे चार महामार्ग जात आहेत. त्या महामार्गावरच अनेक अपघातांची नोंद झाली आहे. वेगाशी स्पर्धा करणारी वाहने या महामार्गावर चालविली जात आहेत. त्यामुळे हे अपघात घडत आहेत. अनेक चारचाकी वाहनांना अपघात झाल्यानंतर तात्काळ उघडणाऱया एअर बॅग आहेत. या अत्याधुनिक अशा एअर बॅग आतील व्यक्तीचा बळी जावू नये म्हणून या वाहनात बसविल्या असतात पण तरीही या अपघातात अनेकांचा मृत्यू झालेल्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या वाहनांचा वेग अधिक पटीने जास्त असल्याचे समोर येत आहे.
दारू पिऊन वाहन चालविल्याने अनेक अपघात
वाहन चालविताना दारू पिऊ नये असे अनेकवेळा सांगितले जाते. तसेच सामाजिक प्रबोधनही केले जात आहे. पण याकडे वाहनचालक सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. अनेक अपघात हे दारू पिऊन वाहन चालविल्याने झाले आहेत. तशा पोलीसांच्याकडे नोंदी आहेत. त्यामुळे महामार्गावर तसेच राज्यमार्गावर दारू पिऊन वाहन चालविणाऱया चालकाची तपासणी करणे गरजेचे आहे त्याचवेळी हे अपघात रोखता येवू शकतात.
सन 2022 मध्ये झालेल्या अपघाताची नोंद
महिना अपघातातील मृत्यू गंभीर जखमी एकूण अपघात
जानेवारी 44 42 86
फेब्रुवारी 31 37 75
मार्च 38 72 115
एप्रिल 33 63 97
एकूण 146 214 373