शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुख्याध्यापक, व्यवस्थापन मंडळ आणि शिक्षण खात्याची संयुक्त बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
बिबटय़ाचे वास्तव्य वाढत चालल्याने परिसरातील 22 शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ऑनलाईन शाळा भरविण्याचा विचार शिक्षण खात्याने चालविला आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता मुख्याध्यापक आणि शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांची मते नोंदवून घेण्यात आली. बिबटय़ा जेरबंद होईपर्यंत ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा विचार शैक्षणिक खात्याने चालविला असल्याचे सुतोवाच मिळाले आहेत.
बिबटय़ाचे वास्तव्य वाढत चालल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी चर्चा करण्याकरिता सोमवारी शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा सुधारणा कमिटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शाळा सुरू ठेवाव्यात की सुटी जाहीर करावी, याबाबतची मते जाणून घेण्यात आली.
गोल्फ मैदान परिसरात बिबटय़ाने वास्तव्य केले असल्याचे सोमवारी पुन्हा एकदा निदर्शनास आले. आणि याच क्षणी परिसरातील 22 शाळांना अचानक सुटी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जावे लागले. दोन आठवडय़ांच्या सुटीनंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण पहिल्याच दिवशी शाळेत हजर झाल्यानंतर शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. परिणामी विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रिक्षाचालक, पालक किंवा नातेवाईक शाळेत आल्यानंतरच मुलांना घरी जावू देण्यात आले. पण ज्यांचे पालक लवकर आले नाहीत, त्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी शिक्षकवर्गावर पडली. शाळेत पोहोचतो न पोहोचतो तोच सुटी जाहीर झाल्याने पालकांचीदेखील गैरसोय झाली.
अशा विविध समस्या निर्माण होत आहेत. पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू ठेवल्यास विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू करावी का? याबाबत ग्रामीण व शहर क्षेत्र शिक्षणाधिकाऱयांनी मुख्याध्यापकांकडून मते जाणून घेतली. सध्या धोका अधिक असल्याने ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू करण्यास कोणतीच हरकत नाही. पण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. आगामी काळातील सुटय़ा कमी करून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी मते काही मुख्याध्यापकांनी मांडली. हिंडलगा परिसरातील शाळांच्या सभोवती नागरी वसाहत आहे. हिंडलगा, विजयनगर परिसरातून विद्यार्थी येत असतात. त्यामुळे या शाळा सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची विनंती मुख्याध्यापकांनी मागितली.
वनिता विद्यालय, केंद्रीय विद्यालय तसेच हनुमाननगर परिसरातील शाळेत विविध परिसरातून विद्यार्थी येत असतात. याचदरम्यान बिबटय़ा असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका आहे, हे ओळखून शाळा बंद ठेवाव्यात का? असा विचारही समोर आला.
मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन मंडळाने दिलेल्या सूचना व सद्य परिस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱयांना सादर करण्यात येईल, त्यानंतर शाळांना सुटी द्यावी की ऑनलाईन शिक्षण सुरू करावे, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ग्रामीण क्षेत्र शिक्षणाधिकारी व शहर क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी दिली. पण बिबटय़ा जेरबंद होईपर्यंत शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी योजना राबविण्याच्यादृष्टीने शिक्षण खाते प्रयत्नशील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.