विजय सरदेसाईंची टीका : विधानसभेतही प्रमोद सावंत खोटे बोलल्याचे सिद्ध
प्रतिनिधी /मडगाव
खाणी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आता 22-23 नोव्हेंबर ही नवीन तारीख जाहीर केल्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी त्यांच्यावर टीका करताना सावंत यांना खाणी सुरू करण्याऐवजी फक्त तारखा जाहीर करण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास अवघ्या सहा महिन्यांत आम्ही दुप्पट वेगाने गोव्यात खाण व्यवसाय सुरू करू असे हे सरकार म्हणत होते. हा मुद्दा विधानसभेत चर्चेस आला त्यावेळी मी येत्या पावसाळय़ापर्यंत या सरकारकडून गोव्यात खाणी सुरू होणे शक्मय नाही असे म्हटले होते. माझे म्हणणे खरे होते हे आता सावंत यांनी जाहीर केलेल्या नवीन तारखेवरून सिद्ध झाले आहे. सहा महिन्यांत खाणी सुरू करू असे आश्वासन देताना मुख्यमंत्री चक्क विधानसभेत खोटे बोलले, असा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. जुवारी पूल असो, मोपा विमानतळ असो किंवा खाणी असोत, या मुख्यमंत्र्यांना फक्त तारखा जाहीर करणेच येते. त्या तारखेप्रमाणे काम पूर्ण कधीच करता येत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.