अभिनेता सचिन पिळगावकर यांचे परखड मत : 17 वर्षांनंतर दिली बेळगावला भेट
प्रतिनिधी /बेळगाव
आज मनोरंजनाची अनेक माध्यमे आहेत. ओटीटी माध्यमाने चित्रपटसृष्टी संपविली, अशी ओरड केली जात आहे. परंतु भारतीय चित्रपटसृष्टी कधीही थांबणार नाही. मागील काही वर्षात प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांनी करोडो रुपये कमविले. जोवर मातृभाषेतून प्रादेशिक चित्रपट तयार होत राहतील तोवर या क्षेत्राला कोणतीही भीती नाही. त्यामुळे मातृभाषा टिकविली पाहिजे, असे परखड मत अभिनेता सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केले.
रविवारी रोटरीच्या कार्यक्रमासाठी ते बेळगावमध्ये आले होते. त्यांनी स्वरुप-नर्तकी चित्रपटगृहाला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनानंतर चित्रपटांची गती कमी झाली. पूर्वी चांगला सिनेमा किमान 21 आठवडे चालत होता. सध्या मात्र चित्रपट दोन दिवस तरी चालतो की नाही, याची शाश्वती नाही. प्रेक्षकांना काय आवडते हे पाहून चित्रपट करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वामी विवेकानंदांची भूमिका करण्याची इच्छा
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यातील बऱयाच चित्रपटांना प्रेक्षकांनी उचलून धरले. परंतु मला स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारायची आहे. विवेकानंद मला खूप प्रभावित करतात, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित सिनेमामध्ये काम करायला आवडेल, असे ते म्हणाले. चित्रपट क्षेत्रात येऊ पाहणाऱया प्रत्येकाचे प्रथमतः आपल्या भाषेवर प्रभुत्व पाहिजे. भाषा आली की आपण समोरच्यावर छाप पाडू शकतो, असे पिळगावकर यांनी नमूद केले.
17 वर्षांनंतर बेळगावमध्ये दाखल
‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला. या चित्रपटाला महाराष्ट्रात जितका प्रतिसाद मिळाला तितकाच बेळगावमध्येही मिळाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 17 वर्षांपूर्वी बेळगावला भेट दिली होती. त्यावेळी नर्तकी चित्रपटगृहात हा सिनेमा लागला होता. येथील मराठी प्रेक्षकांनी दिलेली दाद आजही मी विसरलो नसल्याचे अभिनेता सचिन पिळगावकर यांनी सांगितले.