अध्याय बाविसावा
भगवंत देह आणि आत्मा किंवा प्रकृती आणि पुरुष वेगवेगळे कसे आहेत? ते उद्धवाला समजावून सांगत आहेत. वास्तविक पाहता उद्धवाला हे सर्व माहीत आहे आणि त्याला सर्व समजलेय हे भगवंतही जाणून आहेत. परंतु इथेच तर गम्मत आहे. सर्व समजले आहे हे उद्धवाने कबूल केले की, भगवंत निजधामाला जाणार हे निश्चित! म्हणून भगवंत आणि उद्धव होताहोईतो ती वेळ पुढे टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण दोघांनाही एकमेकाचा विरह सहन होण्यासारखा नसतो. भगवंत आणि भक्त यांच्या प्रेमाची महतीच अशी आहे. त्यानिमित्ताने आपल्यालाही अत्यंत गहन अशा तत्वज्ञानाची उकल सविस्तर वाचायला मिळत आहे, हे आपले परमभाग्य होय! भगवंतांनी त्यांचे समजावणे पुढे सुरू केले. ते म्हणाले, आत्मा हा अजन्मा, अव्यय आणि परिपूर्ण आहे. जन्ममरण देहाला आहे. तीन गुण, तीन अवस्था, कार्य, कर्म, मी कर्ता असा अभिमान, हे सर्व देहाभिमानाचे विकार आहेत. आत्मा हा सर्वथा अलिप्तच आहे.
आत्म्याच्या अलिप्तपणाबद्दल सांगायचे झाले तर स्फटिकाचे उदाहरण अगदी चपखल आहे बघ. स्फटिक हा ज्या रंगावर ठेवावा, त्याच रंगाप्रमाणे दिसतो. असे जरी असले तरी स्फटिक हा मूळचाच शुद्ध असल्यामुळे त्या रंगापासून भिन्नच असतो. त्याप्रमाणे त्रिगुणांच्या मर्जीनुसार वागतोय असे दिसत असले तरी आत्मा हा अलिप्तच असतो. आता तो देहांत असूनही मुक्त कसा असतो, तेही सांगतो. ज्याप्रमाणे घटात असलेले पाणी चंद्राचे प्रतिबिंब घटात आणते, त्याप्रमाणे शुद्ध आत्मा, जिवाच्या रूपाने देहामध्ये त्याचा अभिमान धरून वावरतो आहे असे
वाटते.
घट निश्चल असला तर बिंबही निश्चल असते. घट हलला तर बिंबही हलते. त्याप्रमाणे या सर्व अवस्था देहाच्या असून जीवात्मा त्या आपल्याच आहेत असे मानीत असतो. पण मानणे आणि असणे यात फरक आहे. घटामध्ये समज काजळ कालवले तर ते सर्व पाणी काळे होऊन जाते. पण त्याच्या आतील बिंबाला किंवा प्रतिबिंबाला काही काळेपणा लागत नाही. तशीच देहाच्या सुख-दुःखांची गोष्ट किंवा पाप-पुण्यांची गोष्ट जीवाच्या किंवा आत्म्याच्याही माथ्यावर येत नाही. आता समज की, ह्या घडय़ातले पाणी त्या घडय़ात भरले. तर त्यांच्यातही चंद्रबिंब दिसतच असते. त्याप्रमाणे ह्या देहातील जीव त्या देहात जातो, म्हणूनच त्याला जीवात्मा असे म्हणतात. चंद्र हा आकाशामध्ये अलिप्तच असतो. तो मिथ्याच प्रतिबिंब रूपाने घटामध्ये भासमान होतो. त्याप्रमाणे आत्मतत्त्व हे स्थिर असून देह आणि आत्मा यांच्या संयोगानेच हे जीवाचे वेड त्याला लागलेले असते.
पण हे सारे लोकांना न समजल्यामुळे देहात्मवादाने ते भ्रांतीत पडले आहेत. त्यामुळे अभिमान हा त्यांना स्वर्गनरकादि भोवऱयात घालून नानाप्रकारच्या योनी भोगावयास लावतो. पुण्यवान असण्याचा अभिमान मानवी देहापासून, ब्रह्मदेवाच्या देहापर्यंत सर्वांना असतो आणि तो सर्व प्रकारचे स्वर्गसुख निश्चयाने भोगवतो. तर कळतनकळत किंवा जाणूनबुजून केलेल्या पापकृत्याचा अभिमान माणसाला खालच्या योनीत जन्म घ्यायला लावून अनेक प्रकारच्या दुःखयोनी भोगवितो.
तात्पर्य, पाप व पुण्य ह्यांचे कर्माचरण हेच जन्ममरण वाढवते. त्यामध्येही जन्ममरणाला छेदून टाकणारा विरळाच एखादा भाग्यवान असतो. त्याची वैशिष्टय़े तुला सांगतो. त्याने निरिच्छपणाने पुण्याच्या राशी जोडलेल्या असतात, स्वधर्माची जोड मिळविलेली असते, त्याच्या अंतःकरणांत प्राणिमात्रांची अत्यंत दया असते आणि संतसेवेची त्याला आवड असते. तो अहिंसेचे माहेरघर असतो, ‘वसुधैव कुटुंबकं’ असे त्याचे मन अद्वैतयुक्त असते.
सारासार विचारांचा तो राजहंस असतो तर जन्ममरणांचा त्याला कंटाळा आलेला असतो. उपनिषदांचा अर्थ ग्रहण करून तो आत्मतत्त्वाचा साधक आणि खरा भावार्थी असतो. संतचरणांवर त्याची पूर्ण भक्ति असते, आणि सद्गुरुंच्या वचनात तो रहात असतो. या सर्व वैशिष्टय़ांमुळे माझ्या कृपेने ह्याच देहांत तो विदेहता पावतो.
क्रमशः