सोनिया गांधी यांचे ‘सीडब्ल्यूसी’मध्ये मार्गदर्शन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हायकमांड सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वात सोमवारी येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली. या बैठकीत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मार्गदर्शन केले. आपल्याकडे कोणतीही जादूची कांडी नाही. केवळ निःस्वार्थ कार्य आणि शिस्त पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणार असल्याचे याप्रसंगी सोनिया गांधी यांनी कार्यकारिणी सदस्यांना सांगितले. तसेच पक्षाचे उद्देश साध्य करण्यासाठी सामूहिक भावनेने कार्य करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यकारिणी बैठकीत गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि देशातील इतर सर्व राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकांसाठी नवी रणनीती तयार करण्यावर चर्चा झाली.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चिंतन शिबिरापूर्वी ‘सीडब्ल्यूसी’ बैठक आयोजित केली होती. या बैठकीत 13 ते 15 मे या कालावधीत उदयपूर येथे होणाऱया चिंतन शिबिराबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाने चिंतन शिबिराबाबत 6 वेगवेगळय़ा समित्या स्थापन केल्या आहेत. ‘चिंतन’ बैठकीपूर्वी समित्यांकडून अहवाल मागवला आहे. सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीमध्ये बोलताना सर्वांनाच कडक शब्दात सुनावले. आतापर्यंत पक्षाने आपल्या सर्वांचे भले केले आहे. आता ते कर्ज पूर्णपणे फेडण्याची वेळ आली आहे. आपल्याला आत्मचिंतन नक्कीच आवश्यक आहे, परंतु आत्मविश्वास आणि मनोधैर्य दुखावले जाईल आणि निराशेचे वातावरण निर्माण होईल अशाप्रकारे कोणीही वागणूक ठेवू नये, असा कडक संदेश त्यांनी दिला. तसेच नजिकच्या काळात होणाऱया निवडणूक आणि व्यवस्थापकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी पुनर्रचित संघटनेची सुरुवात म्हणून याकडे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
13 पासून उदयपूरमध्ये चिंतन शिबिर
काँग्रेसतर्फे उदयपूरमध्ये 13 ते 15 मे दरम्यान चिंतन शिबिर होणार आहे. सुमारे 400 काँग्रेस नेते ‘चिंतन शिबिर’मध्ये सहभागी होतील. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आदी नेते याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत. चिंतन शिबिरात सहा गटात चर्चा होणार आहे. यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक न्याय, शेतकरी, युवक, संघटना आदी विषय हाताळले जाणार आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींना यापूर्वीच कळविण्यात आले आहे. तसेच प्रत्येक दृष्टिकोनातून संतुलित प्रतिनिधित्व आणि समतोल सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.