ग्राम पंचायत नोकर संघाच्या बैठकीत ठराव : नवीन भरती नको
बेळगाव : सध्या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात अनेकांना बढती देण्यात आली आहे. त्यामुळे त्या जागा रिक्त झाल्या आहेत. दरम्यान, संबंधित ग्राम पंचायतमधील कर्मचाऱ्यांनाच बढती मिळावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र काही ग्राम पंचायतमध्ये सदस्य पैसे खाऊन आपल्या मर्जीतील काही जणांना नोकरी देण्याचा प्रयत्न करत असून त्याला संघटनेचा तीव्र विरोध आहे. दरम्यान, ग्राम पंचायतमधील कर्मचाऱ्यांनाच संधी द्यावी, असा ठराव ग्राम पंचायत नोकर संघाच्या बैठकीत करण्यात आला. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी हा ठराव करण्यात आला असून लवकरच याबाबत निवेदन देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. दि. 14 फेब्रुवारी रोजी बेंगळूर येथे ग्राम पंचायत नोकर संघातर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पठिंबा दर्शविण्यात आला असून या मोर्चात सहभागी होण्याचेही ठरविण्यात आले.
सध्या ग्राम पंचायतमध्ये मोठा गोंधळ सुरू झाला आहे. ज्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना बढती मिळाली आहे तेथील जागा रिक्त झाली आहे. मात्र काही ग्राम पंचायत सदस्यांच्या लॉबीमुळे आणि पैशांची मागणी करून आपल्या मर्जीतील संबंधितांना नोकरी देण्याच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. बिल कलेक्टरच्या जागेवर नवीन भरती न करता त्या ठिकाणी वॉटरमन अथवा शिपाई यांची वर्णी लावावी. याचबरोबर क्लार्कच्या जागेवर संगणक ऑपरेटर यांची वर्णी लावण्यात यावी. मागील अनेक वर्षांपासून संबंधित कर्मचारी हे ग्राम पंचायतमध्ये काम करत असतात. त्यांना बढती देणे गरजेचे आहे. मात्र नवीन चेहऱ्यांना संधी देऊन जुन्यांचा हक्क मारण्यात येत असून याबाबत ग्राम पंचायतमधील कर्मचाऱ्यांनाच संबंधित जागांवर बढती द्यावी, असा ठरावही करण्यात आला. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष नाईक, उपाध्यक्ष जितेंद्र कागणकर, कार्यदर्शी संजय चौगुला यांच्यासह तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.