36 साखर कारखान्यांनी मागितली परवानगी : एफआरपी दिल्याशिवाय पुढील परवानगी नाही
प्रतिनिधी/ सोलापूर
येत्या 15 ऑक्टोबरपासून साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होत असून त्यासाठी जिल्ह्यातील 36 कारखान्यांनी परवानगी मागितली आहे. मात्र, आतापर्यंत फक्त तीन कारखान्यांनाच परवानगी मिळाली आहे. यातील अनेक कारखानदारांनी शेतकऱयांच्या एफआरपीच्या रकमा अद्यापही दिलेल्या नाहीत. तेव्हा रकमा भरल्यानंतरच गाळप परवाना देण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 40 साखर कारखाने असून त्यापैकी 36 कारखान्यांनी यावर्षी गाळपासाठी साखर आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे. आतापर्यंत सोलापूर जिह्यातील तीन साखर कारखान्यालाच गाळप परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये व्ही. पी. शुगर तडवळ, लोकमंगल इथेलॉन भंडारकवठे, लोकमंगल ऍग्रो बीबीदारफळ या तीन कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अनेक साखर कारखानदारांनी शेतकऱयांच्या एफआरपी रकमा दिलेल्या नाहीत. त्या रकमा अगोदर भरण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित कारखानादारांना दिल्या आहेत. तेव्हा बाकीच्या उर्वरित कारखान्यांना लवकरच गाळप परवाना मिळणार आहे. त्यातच सध्या जिल्हाभरात पाऊस सुरू असून त्याचा ऊसतोडीवर परिणाम होणार असल्याने 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारा गाळपाचा हंगाम पुढे वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सोलापूर जिह्यात उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यातच सोलापूर जिह्यातील अनेक साखर कारखान्यांकडे कर्नाटक, मराठवाडा तसेच पुणे जिह्यातील ऊस गाळपासाठी येत असल्याने सर्वच कारखान्यांचा गाळप हंगाम हा बरेच दिवस चालणार आहे. सध्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या जिह्यात दाखल होत आहेत.