ऑनलाईन टीम/तरुण भारत
गोव्यातील काँग्रेसचे (Goa Congress) ८ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. काँग्रेसचे नेते मायकल लोबो (Michael Lobo) यांनी रविवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांची भेट घेतली होती. यांनतर ८ आमदार हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार हे नक्की असताना काँग्रेसने मात्र आमचा कोणताही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, दोन दिवस होऊन गेली तरी काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. यावर काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांनी ऑपरेशन कमल फ्लॉप झाल्याचं म्हणत भाजपवर टीका केली आहे.
दरम्यान, गोव्यात काँग्रेस पक्षावर असलेली संकट अद्याप कमी होण्याचे नाव घेत नाही, यातच भाजपचं ऑपरेशन कमल फ्लॉप झाल्याचे टीकास्त्र काँग्रेसचे राज्य प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी भाजपवर सोडले आहे. यातच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्यावरही काँग्रेसने अनेक आरोप केलेत. पक्षातील काही नेते रविवारी नॉट रिचेबल आल्याने ते पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राव हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
यावेळी राव म्हणाले की, आमच्या एकनिष्ठ असलेले कोण आणि पक्षांतर करणारे कोण आहेत हे आम्हाला चांगलंच माहित आहे. यात भाजपकडून आणखी एक प्रयत्न झाला, पण तो फ्लॉप ठरला. दबाव असून आमचे तरुण आणि प्रथम निवडून आलेले आमदारसोबत आहेत. खाण, कोळसा आणि उद्योग लॉबीसह सर्वच स्तरातून आमदारांवर प्रचंड दबाव आणला जात असल्याचा आरोप राव यांनी केला. गेल्या महिन्याभरापासून हे कारस्थान सुरु आहे.
राव पुढे म्हणाले की, भाजपचं ऑपरेशन कमल पूर्णपणे अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. भाजपने महाराष्ट्राप्रमाणेच पक्षाचे दोन तृतीयांश आमदार फोडून आपली संख्या २५ वरून ३३ वर नेण्याचा प्लॅन आखला. असे झाले असते तर भाजपची संख्या ४० पैकी ३३ एवढी झाली असती, तसेचे ते विरोधी पक्ष मुक्त झाले असते. इतकेच नाही तर काँग्रेस आमदारांशी संपर्क करणारे भाजप नेते त्यांच्यासोबत फक्त पैशांबाबत नाही तर ईडी आणि आयकर रेडची धमकी दिली असल्याचा आरोप राव यांनी केला आहे
दरम्यान, पक्षाने आमदार नाराज असल्याचे समजल्यानंतर आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना येथे पाठवले होते. आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यात पक्षाला जवळपास यश आल्याचे दिसत आहे. सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत गोव्यातील काँग्रेसचे ११ पैकी १० आमदार सहभागी झाल्याचे वृत्त आहे.