युवा समितीची टिव्टद्वारे रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील 4 वर्षांपासून कासवगतीने तिसरे रेल्वेगेट येथील ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे. यामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. ओव्हरब्रिजचे काम पूर्ण झाले असल्याने तिसरे रेल्वेगेट येथील ओव्हरब्रिज खुला करावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने टिव्टद्वारे रेल्वेमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
बेळगाव शहराला उद्यमबाग, मजगाव, मच्छे या औद्योगिक वसाहतीला जोडण्यासाठी तिसरे रेल्वेगेट येथील ओव्हरब्रिज महत्त्वाचा ठरणार आहे. ब्रिजचे बांधकाम सुरू असल्याने एका बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. सकाळी व संध्याकाळच्यावेळी कामगार कामावर पोहोचताना व घरी जाताना कोंडी होत आहे. रोजच्या वाहतूक कोंडीने नागरिकदेखील हैराण झाले
आहेत.
ओव्हरब्रिज गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्यात येईल, असे खासदार मंगला अंगडी यांनी स्पष्ट केले होते. लवकरात लवकर ओव्हरब्रिजचे उद्घाटन करावे, अशी मागणी युवा समितीने रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.