‘अग्नीपथ’ योजनेचा संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, चार वर्षांसाठी काम करता येणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशाच्या सशस्त्र सेनांच्या रचनेत अमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी, तसेच त्यांच्यामध्ये आतापेक्षा अधिक प्रमाणात तरुण रक्ताला वाव देण्यासाठी ‘अग्नीपथ’ या महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी येथे एका कार्यक्रमात केला आहे. या योजनेच्या अंतर्गत सैन्यात जाऊन देशाचे संरक्षण करण्याची आस असणाऱया युवकांना मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे.
अशा युवकांना सैन्यदलांमध्ये 4 वर्षांपर्यंत किंवा त्यानंतरही सेवा बजावता येणार आहे. या सेवाकाळात त्यांना सैनिक किंवा त्यांच्या अधिकाऱयांप्रमाणेच वेतन व इतर सुविधा मिळणार आहेत. तसेच सैनिकांसाठी असणारे पुरस्कार आणि शौर्यचक्रे व इतर सन्मानही त्यांना मिळू शकणार आहेत. तथापि, चार वर्षांनंतर सेवेतून बाहेर पडल्यानंतर निवृत्तीवेतन मात्र त्यांना मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. या योजनेअंतर्गत सेवारत असणाऱया सैनिकांना ‘अग्नीवीर’ असे संबोधण्यात येईल.
तीन्ही दलांमध्ये प्रवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे सुतोवाच साधारणतः आठ महिन्यांपूर्वी केले होते. मंगळवारी ही योजना प्रत्यक्षात साकारली आहे. येत्या 90 दिवसांमध्ये अग्नीवीरांची प्रथम तुकडी सेनादलांमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. या उपग्रमाअंतर्गत भारतीय सेनेच्या तीन्ही दलांमध्ये प्रवेश घेता येणे शक्य आहे.
सुरक्षा बळकट करण्यासाठी
ही योजना देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी आणण्यात आली आहे. सेनादलांमध्ये युवकांना अधिक संधी मिळावी, तसेच आपले शौर्य गाजविण्याचा मार्ग उपलब्ध व्हावा हा मुख्य उद्देश आहे. चार वर्षे सेनेत सेवा बजावल्यानंतर हे युवक पुढच्या काळातही सेनादलांमध्येच राहू शकतात. या चार वर्षांच्या काळात त्यांना पूर्णवेळ सैनिकाप्रमाणेच काम करावे लागणार असून त्यांना वागणूकही तशीच दिली जाणार आहे. त्यांना त्यांच्या सेनादलाचे पूर्ण प्रशिक्षण, शस्त्र चालविण्याचे शिक्षण आणि इतर सर्व अधिकार आणि कर्तव्ये यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. चार वर्षांच्या कालावधीनंतर युवक बाहेर पडल्यास त्याला 10-12 लाखाचा करमुक्त सेवानिधीही दिला जाणार आहे. चार वर्षांच्या काळात सेवा बजावताना मृत्यू आल्यास मोठय़ा रकमेचा विमा आणि सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
भविष्यकालीन सैनिकांसाठी...
ही योजना भविष्यकालीन सैनिक निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. चार वर्षे या योजनेत काम केल्यानंतर अशा युवकांचे मूल्यवर्धन इतरांपेक्षा अधिक होणार आहे. तो इतर युवकांपेक्षा समाजात अधिक उठून देसेल, तसेच त्याला नंतर इतरत्र नोकरी करण्यासाठीही या पात्रतेचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी केले.
काही आक्षेप
या योजनेवर काही आक्षेपही घेण्यात आले आहेत. यामुळे सैनिकी पेशावर, व्यावसायिकतेवर, लढवय्येपणावर आणि सैन्यदलांच्या आक्रमक क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकेल, अशी शंका काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, ती अनाठायी असल्याचे तीन्ही सेनादलांच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. ही योजना कांतीकारी असून त्यामुळे सेना दलांना मोठेच बळ मिळेल. युवकांना सन्मान आणि देशसेवेची संधी प्राप्त होईल, अशी प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे.
काय आहे ही योजना ?
योजनेची वैशिष्टय़े
ड गुणवत्तेच्या आधारावर युवकांना तीन्ही सेनादलात नोकरी देण्याची योजना
ड नोकरीचा प्राथमिक कालावधी 4 वर्षांचा. यात प्रशिक्षण काळाचाही समावेश
ड नोकरीच्या कालावधीत संपूर्ण अधिकार व कर्तव्ये पूर्णवेळ सैनिकांप्रमाणेच
ड सैनिकांप्रमाणेच सर्व प्रशिक्षण, वेतन, दर्जा आणि सोयी देण्याची व्यवस्था
ड चार वर्षांनंतर 25 टक्के युवकांना सेनादलांमध्येच पुढे सेवा बजावता येणार
ड 75 टक्के युवकांना चार वर्षांनंतर सेवामुक्तीच्या वेळी 10-12 लाख रुपये
ओळख, वयोमर्यादा, वेतन
ड हे सैनिक अग्नीवीर म्हणून ओळखले जाणार, प्रवेश वय 17.5 ते 21 वर्षे
ड त्यांना वेतन प्रतिमहिना 45 हजार रुपये मिळणार, मात्र निवृत्तीवेतन नाही
ड भूदल, वायुदल, नौदलाच्या कायद्यानुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाणार
ड यंदाच्या वर्षात एकंदर 46 हजार अग्नीवीरांची नियुक्ती करण्याचे ध्येय
ड वेतनाचा काही भाग अंतिम पॅकेजमधील योगदानासाठी ठेवून घेतला जाणार
ड 4 वर्षांनंतर 25 टक्के अग्नीवीरांना पूर्णवेळ सैनिक म्हणून सामावून घेणार
ड 4 वर्षांनंतर पूर्णवेळ सैनिक होण्यासाठी सर्व अग्नीवीर अर्ज करु शकणार
ड 4 वर्षांनंतर मिळणारा 10 ते 12 लाखांचा निधी पूर्णतः प्राप्तीकरमुक्त
सेवाकाळात हौतात्म्य आल्यास
ड 48 लाख रुपयांचा जीवन विमा विनायोगदान दिला जाणार
ड याशिवाय 44 लाखांचे सानुग्रह अनुदान कुटुंबियांना मिळणार
ड 4 वर्षांपैकी उरलेल्या सेवाकाळाचे वेतन आणि सेवानिधी मिळणार