विरोधकांनी रोखले 50 मिनिटे कामकाज : मडगाव जिल्हा इस्पितळच ’कोमात’ गेल्याचा आरोप : आरोग्यमंत्र्यांवर चौफेर टीका,आरोप करण्यापेक्षा सूचना, सल्ले द्या : आरोग्यमंत्री
पणजी : मडगाव येथील जिल्हा इस्पितळच सध्या कोमात गेले असून आरोग्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे निवडणूक जुमला आहे. मंत्र्यांनी संपूर्ण आरोग्य सेवा क्षेत्रे वाळपईमय करून टाकलेली आहेत, त्यामुळे इस्पितळे उभारण्यासाठी अशा असंख्य आरोपांची सरबत्ती करत बुधवारी विरोधकांनी विधानसभेत अक्षरश: रान पेटवले. प्रारंभीची दहा मिनिटे अन्य विषयावरून झालेली चर्चा वगळता उर्वरित 50 मिनिटे केवळ एकाच प्रश्नावरून विरोधकांनी कामकाज रोखून धरले. त्यावरून या विषयाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात आले. आमदार कार्लोस फरेरा, विजय सरदेसाई आणि क्रूझ सिल्वा यांनी आरोग्य खात्याच्या गंभीर स्थितीबद्दल सदर प्रश्न विचारला होता. राज्यात मडगाव, फोंडा, आदी ठिकाणी असलेल्या इस्पितळांमध्ये आवश्यक यंत्रणा तसेच डॉक्टर्स आदी कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऊग्णांची आबाळ होत आहे. अशा स्थितीत तेथील डॉक्टर्स ऊग्णांना लगेच गोमेकॉत पाठवतात. अशाप्रकारे गत एका वर्षात मडगावमधून 3612 तर फोंड्याहून 1899 ऊग्णांना गोमेकॉत पाठविण्यात आले आहेत. यावरून या इस्पितळांच्या स्थितीची कल्पना येते, असा आरोप विरोधी आमदारांनी केला.
मडगाव इस्पितळात सोयीसुविधांची वानवा
मडगाव इस्पितळात असंख्य सोयी सुविधांची वानवा असली तरी वाळपईतील लोक मात्र तीन तीन बसेस भरून रोज येतात आणि ज्या लोकांनी इस्पितळासाठी अल्प मोबदल्यात म्हणण्यापेक्षा फुकटात आपल्या जमिनी दिल्या त्यांच्यामधील कुणालाच या इस्पितळात नोकरी मिळत नाही, असा आरोप सरदेसाई यांनी केला. त्याबरोबर आरोग्यमंत्री संतप्त बनले. एवढ्या महत्त्वाच्या विषयावर बोलायचे असताना तुम्ही मध्येच वाळपईचा विषय का काढता? असा सवाल करत त्यांनी विषयाला बगल देण्याचे प्रयत्न केले. तसेच विरोधकांचे आरोप चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत, असे ते म्हणाले. मडगाव, फोंडा इस्पितळांमधून किती ऊग्णांना गोमेकॉत पाठवले याची आकडेवारी देणाऱ्या विरोधकांनी त्या दोन्ही इस्पितळात किती लाख ऊग्णांवर उपचार केले ती आकडेवारीही लक्षात घ्यावी, असे ते म्हणाले.
कर्करोग रुग्णांचेही हाल : युरी आलेमाव
सुमारे 500 खाटांची क्षमता असलेल्या दक्षिण जिल्हा इस्पितळात सीटी स्कॅन, एमआरआय, आयसीयू, सुपर स्पेशालिटी डेन्टल तपासणी यासारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. कॅन्टिन नाही, लिफ्ट चालत नाही, डायलेसीस ऊग्णांना तर थेट गोमेकॉत पाठविण्यात येते. रात्रीच्यावेळी तर ऊग्णांची पार आबाळ होते. अस्थिरोग, न्युरोलॉजिस्ट यासारखे तज्ञ डॉक्टर्स नसल्यामुळे ऊग्णांचे हाल होतात. तीच परिस्थिती कर्करोगी ऊग्णांचीही होत असते. त्यामुळे त्यातील बऱ्याच जणांना नंतर एक तर गोमेकॉत किंवा सरळ खासगी इस्पितळात पाठविण्यात येते, असे दावे आमदार युरी आलेमाव यांनी केले.
‘उजो लावपाचे’ काम नको : मंत्री विश्वजित राणे
त्यावर बोलताना आमदार विरेश बोरकर यांनी अॅम्बुलन्स सेवा आणि त्यातून आणण्यात येणाऱ्या ऊग्णांसंबंधी एक गंभीर आरोप केला. त्याला आरोग्यमंत्र्यानी जोरदार आक्षेप घेतला. विरोधकांनी निदान विधानसभेत बोलताना तरी तारतम्य बाळगावे. ‘उजो लावपाचें’ काम करू नये. त्यांच्या एखाद्या वक्तव्यामुळे संपूर्ण आरोग्य सेवेबद्दलच लोकांच्या मनात भीती निर्माण होऊ शकते याची जाणीव ठेवावी, असा सल्ला राणे यांनी दिला. त्यापेक्षा सरकारला चांगले सल्ले द्या, आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम कऊया, असे ते म्हणाले. पुढे बोलताना श्री. राणे यांनी, विरोधकांनी केलेले सर्वच आरोप चुकीचे आहेत, असे आपण म्हणत नाही. अनेक त्रुटी असू शकतात. त्या सोडविण्याचे प्रयत्न कऊया असेही ते म्हणाले.