अग्निपथ भरती नियमांमध्ये मोठा बदल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अग्निवीर योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत हजारो जवानांची भरती झाली आहे. प्रशिक्षणानंतर अनेक जवानांना नियुक्तीही देण्यात आली आहे. अग्निपथ योजनेच्या भरती नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला असून सैन्यात तांत्रिक पदांवरील भरतीसाठी तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची या पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून याची माहिती दिली आहे. अग्निपथ योजनेच्या अंतर्गत पॉलिटेक्निक आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना तांत्रिक पदांवर भरती केले जाणार आहे. अग्निवीरांच्या निवडीत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना प्राथमिकता मिळणार आहे. तांत्रिक पदांकरता एक वर्षाच्या आयआयटीत उत्तीर्ण उमेदवारांना 30 गुण तर दोन वर्षांच्या आयआयटीत उत्तीर्ण उमेदवारांना 40 गुणांचा बोनस देण्यात येईल. याचबरोबर डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 50 गुण बोनसदाखल मिळतील. अग्निवीर योजनेत सामील होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची सूचना केंद्र सरकारने आयटीआय संस्थांना केली आहे.
अग्निवीर योजनेच्या अंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना 4 वर्षांसाठी सैन्याच्या सेवेत सामील केले जाते, यातील 25 टक्के जवानांना सैन्यातील सेवेच्या कार्यकाळात विस्तार देण्यात येणार आहे. तर 4 वर्षांनंतर बाहेर पडणाऱया युवक-युवतींना रोजगारात प्राथमिकता दिली जाणार आहे. याशिवाय त्यांच्या कौशल्य विकासावर लक्ष दिले जाणार आहे. तिन्ही सैन्यदलांमध्ये याच योजनेच्या अंतर्गत भरती होत आहे.