मुंबई / वृत्तसंस्था
मायदेशातच होणाऱया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी टी-20 मालिकेसाठी आज भारतीय क्रिकेट संघाची निवड होणे अपेक्षित आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारे उमरान मलिक, मोहसिन खानसारखे उदयोन्मुख खेळाडू व शिखर धवन, दिनेश कार्तिकसारखे ‘डार्क हॉर्सेस’ संधीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी टी-20 वर्ल्डकपनंतर भारतातर्फे एकही सामना न खेळलेल्या हार्दिक पंडय़ाचे पुनरागमनही अपेक्षित आहे.
अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने आयपीएलमध्ये फॉर्म व फिटनेस दाखवला असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांच्या आगामी मालिकेसाठी त्याचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. अलीकडे त्याने सातत्याने गोलंदाजी केली असून यामुळे राष्ट्रीय संघनिवडीतील मोठा अडसर दूर झाला आहे. आरसीबीतर्फे फिनिशरची जबाबदारी चोख पार पाडणाऱया दिनेश कार्तिकचाही विचार होणे अपेक्षित आहे.
दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीत आयपीएल खेळत असणारे काही भारतीय खेळाडू 15 जून रोजी इंग्लंडला रवाना होणार असून त्यांना या टी-20 मालिकेत समाविष्ट करुन घेतले जाणार नाही. यात रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत व जसप्रित बुमराह या तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणाऱया खेळाडूंचा प्राधान्याने समावेश असेल. जूनच्या उत्तरार्धात आयर्लंडविरुद्ध होणाऱया 2 टी-20 सामन्यांसाठी देखील हीच रणनीती अपेक्षित आहे. तसे झाल्यास नेतृत्वाची जबाबदारी धवन किंवा पंडय़ा यांच्यापैकी एकाकडे सोपवली जाऊ शकते. यापैकी, धवनने गतवर्षी लंकेविरुद्ध नेतृत्वाची धुरा सांभाळली होती तर हार्दिक पंडय़ाने यंदा आयपीएल प्रँचायझी गुजरात टायटन्सतर्फे नेतृत्वाची उत्तम चुणूक दाखवली आहे.
युवा खेळाडूंचा प्रभाव
यंदाच्या आयपीएलमध्येही अनेक युवा खेळाडूंनी उत्तम खेळ साकारला. एकीकडे, उमरान मलिकने जवळपास प्रत्येक सामन्यात वेगवान गोलंदाजीचे विक्रम प्रस्थापित केले तर दुसरीकडे, डावखुऱया मोहसिन खानने वेग व अचूकता यांचा उत्तम मिलाफ साधला. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने म्हटल्याप्रमाणे वरिष्ठ स्तरावर डावखुरे जलद गोलंदाज सर्वाधिक ‘डिमांड’मध्ये असतात, हे खरे झाले तर मोहसिनला संधी मिळू शकते. पंजाबतर्फे डावखुऱया अर्शदीपने एकापेक्षा एक अव्वल दर्जाचे यॉर्कर टाकले असून त्याचाही विचार होऊ शकतो.
डेथ ओव्हर्समध्ये अर्शदीपची इकॉनॉमी लक्षवेधी राहिली असून फलंदाजीत तिलक वर्माने पदार्पणाच्या आयपीएल मोहिमेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबई इंडियन्समधील कर्णधार रोहित शर्मा त्याचा विशेष प्रशंसक असून ही बाबही महत्त्वाची ठरु शकते. दीपक हुडा, वेंकटेश अय्यर यांना विंडीज, लंकाविरुद्ध मालिकेत मध्यफळीत खेळवले गेले. आता त्यांचे स्थान अबाधित राहणार का, हे या निवडीत स्पष्ट होईल.
यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव बहरात असून राहुल तेवातियालाही संधी मिळू शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱया टी-20 वर्ल्डकपसाठी अद्याप अवधी असला तरी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेदरम्यान संघातील मुख्य खेळाडू निश्चित होऊ शकतात. त्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरु शकते.