विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा : भाजपच्या पाडापाडीच्या राजकारणावरही टीका
वार्ताहर/पोर्ले तर्फ ठाणे
शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. शंभर दिवसांनी मंत्रिमंडळही बनविले, पण ज्या आमदारांना मंत्रीपदे मिळालेली नाहीत ते आमदार नाराज आहेत. ते फुटण्याची भीती असल्यानेच मुख्यमंत्री शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीत, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी राज्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना शिंदे-फडणीस सरकारच्या कारभारावर टीकास्त्र सोडले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार अरूण लाड, माजी आमदार राजू आवळे, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्या पक्षांचे विचार, विचारधारा वेगळी होती तरीही मतभेद असणारे मुद्दे बाजूने ठेवून राज्यातील जनतेच्या हिताचा कारभार केला. एकमेकांचा सन्मान ठेवून काम केले. ही बाब उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातही स्पष्ट केली. विकासाचे जे निर्णय घेता येतील, ते घेतले. शेतकऱयांना मदत झाली पाहिजे ही भूमिका घेतली. कोरोनाच्या संकटकाळात कोणाचेही पगार थांबवले नाहीत.
हे ही वाचा : कोल्हापुरातील गद्दारांना जागा दाखवू; अजित पवारांचा इशारा
145 आकडा गेल्यावर शिंदेही सत्तेतून जातील
शिंदे सरकारचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले, आताचे सरकार काय करते आहे, तेच कळत नाही, अशी स्थिती आहे. पन्नास खोके एकदम ओक्के हे आता काय आहे? हे राज्यातील जनतेला कळाले आहे. या सरकारने दुसऱयाचे ऐकायचे नाही, असेच ठरविले आहे. लोकशाहीत असे चालत नाही. हा महाराष्ट्र आहे. इथे मूठभर लोकांचे राज्य चालणार नाही. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही. एकनाथ शिंदेही मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कायम बसणार नाहीत. 145 आकडा गेला की तेही सत्तेतून जातील, असा टोला पवार यांनी लगावला.
भाजपवर टीकास्त्र
अजित पवार यांनी भाजपच्या नेतृत्वाचाही समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपने कर्नाटकचे सरकार पाडले, महाराष्ट्रातही सरकार पाडले. पण जे हातात आहे ते त्यांना चालविता येत नाही. महाराष्ट्रात तर भाजपने कहर केला. यापूर्वी असे कधीही झाले नव्हते ते भाजपने केले. शिंदे काय करत आहेत, ते त्यांनाच कळत नाही. बीकेसीच्या मेळाव्यात लोक भाषण सुरू असताना परत जात होते, त्यावरून दिसले. पत्रकारांनी जर प्रश्न विचारला तर शिंदे साहेबांचे मित्र उत्तरे देतात. अशा पद्धतीने राज्य कारभार करणारे मुख्यमंत्री शिंदे केवळ आमदार फुटतील, या भीतीने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करत नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले…
राष्ट्रवादी आणि पावसाचे नाते काय? हे राज्याने पाहिले.
यापुढे मविआने मताची विभागणी होणार नाही हे पाहिले पाहिजे.
सत्ता येते, जाते अजित पवार सत्तेला हापापलेला नाही.
शिंदे गटाने एसटी बुकींगसाठी 10 कोटी कुठून आणले?
लोकांना एसटी बस मिळाल्या नाहीत. अनेक मार्गावरील एसटी रद्द झाल्या.
उद्धव ठाकरेंचे भाषण प्रभावी, शिंदे काहीही बोलत सुटले
शिवतीर्थावरील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण प्रभावी झाले पण मुख्यमंत्री शिंदे बीकेसीवरील सभेत समोर पहिल्यांदाच एवढे लोक दिसले म्हणून काहीही बोलत सुटले. वास्तविक भाषणात त्यांनी बेरोजगारी, महागाईवर बोलणे आवश्यक होते, असा चिमटा अजित पवार यांनी काढला.
कोल्हापुरातील गद्दारांना जागा दाखवू
शिवसेनेतून फुटलेले 40 आमदार पैशाचा पाऊस पाडत आहेत. महाराष्ट्रात जे झाले ते दुर्दैवी होते. ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हा फुटलेले आमदार निवडून आले नाहीत. नारायण राणे पोटनिवडणुकीत पडले. कोल्हापुरात देखील गद्दार लोक निघाली आहेत. त्यांना त्यांची जागा आगामी निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा अजित पवार यांनी दिला.