सभापती रमेश तवडक यांचे प्रतिपादन : पर्वरीत राज्याचा विधिकारदिन उत्साहात अनेकांचे सत्कार,अनेकांना श्रद्धांजली
प्रतिनिधी /पणजी
पर्वरी सचिवालयात विधिकारदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सभापती रमेश तवडकर यांनी स्वागतपर भाषणात आतापर्यंतच्या सर्व आजी-माजी आमदारांनी केलेल्या कार्याचा गौरव करीत गोव्याच्या जडण-घडणीत त्यांचाही मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. दळण-वळणाच्या सोयी नसतानाही पूर्वीच्या आमदारांनी जनसेवेसाठी झोकून दिल्यानेच गोव्याने विकासाच्या, शिक्षणाच्या बाबतीत घेतलेली झेप उल्लेखनीय असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. गोव्याला मिळालेला घटकराज्याचा दर्जा आणि त्यानंतरच्या प्रगतीचा आढावा आपल्या भाषणात घेताना त्यांनी विद्यमान आमदारांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र यावे असे सांगितले. विरोधाला विरोध केल्यास राज्याचा विकास थांबतो, असे मत व्यक्त केले.
विधिकारदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खास अतिथी म्हणून हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, सभापती रमेश तडवकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, विरोधी पक्षनेते, युरी आलेमाव, विठ्ठल गोन्साल्वीस, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला बहुतांश आजी-माजी आमदारांनी उपस्थिती लावली.
माजी दिवंगत आमदारांना श्रद्धांजली
या कार्यक्रमाच्या सुरवातीला लुईस कार्दोज, पांडुरंग राऊत, ज्योटेन परैरा, शिवदास वेरेकर या माजी दिवंगत आमदारांना दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
माजी आमदारांचा सन्मान
लुईझिन फालेरो, मायकल फर्नांडिस, हरर्क्युलान दोरादो या माजी आमदारांना श्रीफळ, पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
आजच्या विधिकारदिन कार्यक्रमात काही माजी आमदारांनी म्हादई बचावाचा नारा दिला. त्यात शंभू भाऊ बांदेकर म्हणाले, सरकारने विकासाचा टप्पा गाठत असताना गोव्याच्या संस्कृतीवर व अस्मितेवर जर घाला होत असेल तर लोकांबरोबर राहून त्यांना साथ द्यायला हवी. आज म्हादईचे संकट राज्यावर आले असून, हा विषय सहजरित्या न घेता म्हादई वाचविण्यासाठी प्रत्यक्ष झोकून द्यायला हवे असे सांगितले. विधिकारदिनानिमित्त आयोजित चर्चेत माजी आमदार प्रकाश वेळीप, दयानंद नार्वेकर, सदानंद मळीक यांनीही भाग घेतला.
चांगला राजकारणी होण्यास चांगला
माणूस असणे आवश्यक : आर्लेकर
हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले, विद्यमान आमदारांनी मी निवडून कशासाठी आलो, जनतेने मला कशासाठी निवडून दिले याची आठवण प्रत्येकक्षणी ठेवणे गरजेचे आहे. आजच्या या विधिकारदिन कार्यक्रमाविषयी बोलायचे झाल्यास माजी आमदारांच्या कार्याची आठवण प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. नवख्या आमदारांनी अभ्यासाअंतीच एखादा विषय विधानसभेत उपस्थित केल्यास तो सुटला जाऊ शकतो. विधानसभा अधिवेशन काळात सर्वांना समान न्याय देण्याचे काम हे सभापती करीतच असतात. परंतु तरीही विरोधकांना आपल्यावर कुठेतरी अन्याय झाला किंवा बोलू दिले नाही, असे वाटते. परंतु तसे काही नसते. चांगला राजकारणी होण्यासाठी चांगला माणूस म्हणून पुढे येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
निसर्गविरोधी कारवाया थांबवा : निर्मला सावंत
म्हादई ही नदी गोव्याची जीवनदायिनी आहे. कर्नाटकाने गोव्याचे पाणी पळविणे म्हणजे निसर्गविरोधी कारवाई आहे. या विरोधात विद्यमान सरकारने कडक भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी म्हादई बचाव आंदोलनाच्या नेत्या निर्मला सावंत यांनी केली. विधिकरदिन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. म्हादईप्रश्नी आतापर्यंत जरी यश आले नसले तरी म्हादई नदीला वाचविण्यासाठी वेगळी आखणी करावी लागेल आणि याला सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.