केंद्र सरकारकडून मात्र ठाम समर्थन, आक्षेप बिनबुडाचे असल्याचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या नूतन वास्तूवर सोमवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते चार सिंहाच्या राष्ट्रीय चिन्हांची स्थापना करण्यात आली आहे. हे सिंह संतप्त दिसतात असा नवा आक्षेप आता विरोधी पक्षांनी घेतला आहे. असे संतापलेले सिंह आपल्या राष्ट्रीय संस्कृतीच्या विरोधात आहेत असेही विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी या राष्ट्रीय चिन्हाची स्थापना संसदेच्या नूतन वास्तूवर करताना हिंदू पद्धतीची पूजाअर्चा आणि प्रक्रियेचा अवलंब केला होता. त्यामुळे विरोधी पक्ष संतापले होते. या राष्ट्रीय चिन्हाची स्थापना करताना पंतप्रधान मोदी यांनी औचित्यभंग केला असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.
संतप्त सिंह का ?
चार सिंहांचे हे राष्ट्रीय प्रतीक किंवा चिन्ह निवडताना केंद्र सरकारने भारताच्या राज्यघटनेचा अवमान केला आहे, असा आरोप अनेक विरोधी पक्षांनी केला. घटनेच्या पुस्तकात ज्या प्रकारचे ‘शांत आणि प्रसन्न वदनाचे’ सिंह आहेत, तसे सिंह संसदेच्या नूतन वास्तूवर नाहीत. हे संतापलेल्या सिंहांचे चिन्ह घटनेच्या विरोधात जाणारे आहे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
सरकारकडून समर्थन
विरोधी पक्षांचे आरोप केवळ राजकीय हेतूने आणि निराशेपोटी करण्यात आलेले आहेत, असा प्रतिवाद भाजपने केंद्र सरकारने केला आहे. हे चिन्ह इतिहासकालीन राजा अशोकाच्या चिन्हाप्रमाणेच आहे. राजा अशोकाच्या काळातील हा सिंहस्तंभ सारनाथ येथे आजही आहे. याच सिंहस्तंभाची जशीच्या तशी प्रतिकृती संसदेच्या नव्या वास्तूवर स्थापन करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. इतर अनेक केंद्रीय मंत्र्यांनी हीच कारणमीमांसा केली आहे. विरोधकांजवळ मुद्दे नाहीत. त्यामुळे ते निरर्थक मुद्दे उपस्थित करुन स्वतःचे समाधान करुन घेत असतात, असे खोचक प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले.