‘अग्निपथ’वरील वादादरम्यान मोदींचे विधान ः
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या प्रगती मैदानात भुयारी मार्गाचे उद्घाटन रविवारी केले आहे. दशकांपूर्वी भारताची प्रगती, भारतीयांचे सामर्थ्य, भारतीय उत्पादने, आमच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी प्रगती मैदानाची निर्मिती झाली होती. परंतु प्रगती मैदानाची प्रगती बऱयाच काळापूर्वी थांबली होती. याची योजना केवळ कागदावर होती, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. परंतु हा आजचा नवा भारत, हा भारत संकटांवर मार्ग शोधतो, नवे काम सुरू केल्यावर विरोधाला सामोरे जावे लागते असे म्हणत मोदींनी एकप्रकारे अग्निपथ वादाप्रकरणी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.
हे केवळ तसवीर (छायाचित्र) बदलण्यासाठी केले जात नसून यामुळे तकदीर (भविष्य)ही बदलता येऊ शकते. दिल्लीमध्ये केंद्र सरकारचा पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर आहे. याचा थेट परिणाम आणि यामागील उद्देश ईज ऑफ लिव्हिंगचा आहे. दिल्ली-एनसीआरच्या समस्यांवर उपाययोजनांसाठी मागील 8 वर्षांमध्ये आम्ही अभूतपूर्व पावले उचलली आहेत. यामुळे प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत झाल्याचे मोदी म्हणाले.
शहरी गरीबांपासून शहरी मध्यमवर्गापर्यंत प्रत्येकाला उत्तम सुविधा देण्याचे काम वेगाने होत आहे. मागील 8 वर्षांमध्ये 1.70 कोटीहून अधिक शहरी गरीबंना पक्के घर देण्यात आले आहे. मध्यमवर्गाच्या लाखो कुटुंबांना देखील त्यांच्या घरासाठी मदत करण्यात आल्याचे मोदींनी म्हटले आहे.