वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये सुरू असलेल्या अदानी प्रकल्पावरून मच्छिमारांनी मंगळवारी निदर्शने केली आहेत. शेकडो मच्छिमारांनी या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुनर्वसना आणि कायमस्वरुपी तोडग्याची मागणी केली आहे. प्रकल्पाची निर्मिती झाल्यास शेकडो एकर किनारी भूमीची हानी होणार असल्याचा आरोप या मच्छिमारांनी केला आहे. मागील आठवडय़ातही शेकडो मच्छिमारांनी तिरुअनंतपुरममध्ये निदर्शन केली होती. डाव्या पक्षांचे सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. विझिंजम चलो या घोषणेसह निदर्शने करणाऱया मच्छिमारांचा समूह बंदराच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचला. याचबरोबर तरुणांनी बाइक रॅली काढली आहे. राज्य सरकारने अनेक आश्वासने दिली. परंतु आतापर्यंत यातील कुठल्याच आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.