डॉ. माधव प्रभू यांचे प्रतिपादन : गैरसमज दूर होणे गरजेचे : केएलईमार्फत जागृतीचे कार्य
प्रतिनिधी /खानापूर
आजच्या युगात अवयव दान हे श्रेष्ठ दान आहे. एकाच्या अवयव दानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. यासाठी अवयव दानाची चळवळ तळागाळात पोहोचली पाहिजे. यासाठी उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. माधव प्रभू यांनी आमटे येथे अर्जुन गावकर यांच्या सत्कारप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर होते.
अर्जुन गावकर यांचा मुलगा सहदेव याचा अपघात झाला होता. त्यात तो ब्रेनडेड झाल्याने डॉ. माधव प्रभू, माजी महापौर विजय मोरे, लक्ष्मण कसर्लेकर, अभिमन्यू डागा यांच्या प्रयत्नातून सहदेवचे वडील अर्जुन यांनी आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या अवयव दानामुळे सहा जणांना जीवदान मिळाले. यासाठी आमटे येथील गणपती देवस्थानच्यावतीने या सर्वांचा सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी डॉ. माधव प्रभू म्हणाले, ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीचे अवयव योग्य वेळेत दान झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. याच्यात कोणताही आर्थिक व्यवहार नसतो. समाजातील गैरसमज दूर होणे गरजेचे आहे. यासाठी तळागाळात अवयव दानाच्या चळवळीबाबत जागृती केली पाहिजे. यासाठी मी तसेच पॅस फाऊंडेशनसह विजय मोरे यांच्या माध्यमातून जागृती कार्य सुरू आहे. केएलईमार्फत ही सेवा देण्यात येते. याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
यावेळी माजी महापौर विजय मोरे म्हणाले, जगात अवयव दानाची चळवळ मोठय़ा प्रमाणात राबविली जाते. श्रीलंकेसारखा छोटा देश अवयव दानात जगात अव्वल आहे. या अवयव दानामुळे अनेकांना जीवदान मिळते. यासाठी लोकांनी कोणताही गैरसमज न बाळगता अवयव दानासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी यशवंत बिरजे, मुरलीधर पाटील, वेवेक गिरी यांची भाषणे झाली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना लक्ष्मण कसर्लेकर म्हणाले, तालुक्यात अवयव दानाची घटना आमटे येथून सुरू झाली आहे. हे कामही अगदी जवळून पाहिल्यामुळे अवयव दान किती आवश्यक आहे, हे मला समजले. तालुक्यात अवयव दान चळवळीसाठी मी कार्यरत राहणार आहे. सुनील चिगुळकर यांनी आभार मानले.