खनापूर तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शिवस्मारकात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते. प्रास्ताविक सचिव एस. एम. बेडरे यांनी केले. यावेळी म. ए. समितीच्या पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय घेऊन निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी येत्या तीन-चार महिन्यात निवडणुका होणार आहेत. एकी झाल्यानंतर कार्यकारिणीची निवड करून पाच उपाध्यक्ष, खजिनदार यासह इतर पदाधिकाऱ्यांची तातडीने निवड करण्यात यावी, तसेच तालुक्यातील मराठी गावात जागृती दौरे करण्यात यावेत, यानंतर तालुकास्तरीय महामेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यात यावेत, महामेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळींना आमंत्रित करण्यात यावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी मांडल्या. याबाबत येत्या एक-दोन दिवसात पुन्हा समितीची बैठक बोलावून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले आहे. कार्यकारिणी निवडण्यासाठी कार्यकर्त्यांची नावे घेण्यात आली असून कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या समिती कार्यकर्त्यांकडून संमतीपत्र घेण्यात येत आहे. समितीमध्ये एकी झाल्याने सर्वांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात येणार असून यासाठी विस्तृत अशी कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे.
तालुका पंचायत, ग्राम पंचायत व जिल्हा पंचायतस्तरीय सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी नावे सुचवण्यासाठी पुढील आठ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. एकी झाल्याने समिती कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले असून येऊ घातलेल्या निवडणुकीत समितीचा झेंडा फडकविण्यासाठी नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवून राष्ट्रीय पक्षांनी तालुक्यात जे वातावरण निर्माण केलेले आहे. त्याला योग्य पद्धतीने उत्तर देवून समिती कार्यकर्त्यांत जागृती निर्माण करण्यात यावी, अशी सूचना कार्यकर्त्यांनी मांडल्या. यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, अरुण सरदेसाई, अमृत पाटील, मुरलीधर पाटील, अविनाश पाटील, रणजित पाटील, अनिल पाटील, नारायण कापोलकर, रामचंद्र गावकर, बाळासाहेब शेलार, जगन्नाथ बिरजे, आबासाहेब दळवी, मारुती परमेकर, मुकुंद पाटील, जयराम देसाई, विलास बेळगावकर, यशवंत बिरजे, निरंजन सरदेसाई, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, गुरव यांची भाषणे झाली.