बांदा – दाणोली जिल्हा मार्ग ठप्प
ओटवणे / प्रतिनिधी-
शनिवारी सायंकाळपासून सह्याद्री पट्ट्यात पावसाच्या सततधारेमुळे दाभिल नदीला पूर आल्यामुळे ओटवणे दशक्रोशीतून वाहणारी तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून सर्वत्र पुरस्थिती आहे. बांदा – दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे पुल शनिवारी रात्रीपासून पाण्याखालीच आहे. त्यामुळे या जिल्हा मार्गवरील वाहतूक ठप्प झाली असुन याचा फटका रविवारी वर्षा पर्यटनासाठी आंबोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांसह इतर वाहन चालकांना बसला आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने बांदा – दाणोली हा जिल्हा मार्ग महत्त्वाचा आहे. आंबोली आणि गोवा ही दोन्ही पर्यटन स्थळे कमी अंतरात जोडणारा हा मार्ग असून पावसाळ्यात या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच बांदा परिसरातून पुणे, कोल्हापूरसह बेळगाव येथे येण्या-जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे प्रवासासाठी या भागातील बहुतांशी वाहन चालक याच मार्गाचा अवलंब करतात.
मात्र , या कमी उंचीच्या पुलामुळे पावसाळ्यात या पुलावर सातत्याने पाणी येऊन या जिल्हामार्गावरील वाहतुक ठप्प होते.