विद्यार्थी-प्रवाशांची मागणी : रस्त्यातच वाहने थांबवण्याचा प्रकार : अनेक चौकांतील दृश्य
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहराचा समावेश स्मार्टसिटीमध्ये झाला आहे. तसा विकासही होताना दिसत आहे. मात्र अर्धवट कामांमुळे अनेकांची डोकेदुखी वाढत आहे. अशीच डोकेदुखी आता रिक्षांच्या अडचणींमुळे होत आहे. नियमांचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग केल्यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यांना शिस्त कोण लावणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसह प्रवाशांतून उपस्थित करण्यात येत
आहे.
कित्तूर चन्नम्मा चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडकडे प्रवेश करताना होणारा रिक्षाचालकांचा अडथळा दूर करण्याची मागणी होत आहे. काही नागरिकांनी या संदर्भात रहदारी पोलिसांनाही विनंती केली असली तरी त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे रिक्षाचालकांचे फावत आहे. परिणामी याकडे जर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर मोठा कोंडमारा होण्याची शक्मयता नाकारता येणार नाही.
बेशिस्त रिक्षांकडे पोलिसांचे दुर्लक्ष
या चौकातून वळताना वाहनचालकांना सर्वप्रथम या रिक्षांचा अडथळा होवू लागला असून बेशिस्तपणे थांबलेल्या रिक्षांकडे पोलीस लक्ष का देत नाहीत? हा नागरिकांचा प्रश्न आहे. त्याच चौकात हेल्मेट व इतर तपासणीसाठी पोलीस थांबलेले असतात. मात्र या रिक्षांवर ते कारवाई करीत नाहीत, असा आरोप होत आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा बाबींकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रिक्षा ठरू लागल्या अडचणीच्या
बेळगावकडून कडोली, काकती, होनगा या भागाकडे जाणाऱया बस या चौकातील बसथांब्यावर थांबविल्या जातात. यामुळे या ठिकाणी विद्यार्थी व इतर प्रवाशांची गर्दी असते. या गर्दीत घुसविल्या जाणाऱया रिक्षा अडचणीच्या ठरू लागल्या असून येणाऱया बसना थांबण्यासाठी जागा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे रहदारी पोलीस विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.